आरटीई अंतर्गत शाळा प्रवेश प्रक्रिया १७ फेब्रुवारीपासून सुरू होण्याची शक्यता आहे. शासनाने अखेर प्राथमिक शिक्षण संचलनालय यांना शासकीय आदेशाद्वारे प्रवेश प्रक्रिया राबवण्यास मान्यता दिली आहे. मात्र, आदेशात नेमकी तारीख नमूद नसली तरी प्रक्रिया लवकरच सुरू होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
यंदा नियमात महत्त्वाचा बदल
या वर्षी प्रवेश प्रक्रियेत मोठा बदल करण्यात आला आहे. पालकांना अर्ज करताना विद्यार्थ्याच्या घरापासून केवळ एक किलोमीटरच्या मर्यादेतील शाळाच निवडता येणार आहेत. ‘गुगल लँडमार्क’च्या आधारे ही अंतरमर्यादा प्रणालीमध्ये निश्चित करण्यात येणार आहे.
शुल्क आणि विलंबाचा मुद्दा
शासनाच्या निर्णयानुसार यंदा प्रती विद्यार्थी १७,६७० रुपये शुल्क संबंधित शाळांना दिले जाणार आहे. याशिवाय, प्रवेश प्रक्रियेला यंदा सुमारे दोन महिन्यांचा विलंब झाला असून, याबाबत पालक व सामाजिक संघटनांनी प्रश्न उपस्थित केले होते.
प्रवेश नाकारल्यास कारवाई
विनाकारण प्रवेश नाकारल्याची तक्रार सिद्ध झाल्यास संबंधित शाळांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे.

Comments are closed.