महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, गट ‘ब’ संयुक्त पूर्व परीक्षेच्या तारखेवरून मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. २१ डिसेंबर रोजीच राज्यभरातील नगरपालिका निवडणुकांचे निकाल जाहीर होणार असल्याने, याच दिवशी नियोजित असलेली MPSC गट ‘ब’ परीक्षा सुरळीत होईल का, याबाबत विद्यार्थ्यांमध्ये तीव्र संभ्रम आणि नाराजी आहे.

लाखो उमेदवार या परीक्षेला बसणार असताना प्रशासन निवडणूक निकाल प्रक्रियेत पूर्णतः व्यस्त राहण्याची शक्यता असल्याने परीक्षेच्या आयोजनावर परिणाम होऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे. ३ डिसेंबर आणि २० डिसेंबर रोजी झालेल्या व होणाऱ्या नगरपालिका निवडणुकांचे निकाल एकाच दिवशी, म्हणजे २१ डिसेंबर रोजी लागणार असून, याच दिवशी MPSC ची संयुक्त पूर्व परीक्षा ठेवण्यात आल्याने परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे.
आयोगाने जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधल्याचे सांगितले जात असले, तरी अद्याप कोणतीही स्पष्ट भूमिका किंवा अधिकृत परिपत्रक जाहीर न झाल्याने परीक्षार्थी अस्वस्थ झाले आहेत. यापूर्वीही परीक्षा काही दिवस आधी पुढे ढकलण्याचे प्रकार घडले असल्याने, आयोगाच्या नियोजनक्षमतेवर विश्वास राहिलेला नाही. यामध्ये भर म्हणजे आयोगातील काही वरिष्ठ अधिकारी सुटीवर असून, अध्यक्षांशी संपर्कही होऊ शकलेला नाही, अशी स्थिती आहे. त्यामुळे निर्णय कोण घेत आहे, आयोगाचा कारभार कोण पाहत आहे, असा प्रश्न उमेदवार उपस्थित करत आहेत.
सातारा, पालघर, रत्नागिरी, नंदुरबार, बीड, धाराशिव, वर्धा, हिंगोली, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, भंडारा, गडचिरोली, गोंदिया अशा सुमारे १५ जिल्ह्यांमध्ये नगरपालिका असल्याने, प्रशासनावर मोठा ताण येणार आहे, हे लक्षात घेता आयोगाने तातडीने स्पष्ट निर्णय जाहीर करावा, अशी ठाम मागणी विद्यार्थ्यांकडून होत आहे. लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न असल्याने, MPSC कडून पारदर्शकता, वेळेत निर्णय आणि जबाबदारीची अपेक्षा आता अधिकच तीव्र झाली आहे.

Comments are closed.