राज्यात एकीकडे अनेक शाळा बंद पडत असतानाही शिक्षकी क्षेत्राकडे तरुणांचा, विशेषतः महिलांचा ओढा कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे. शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी बी.एड. प्रवेश प्रक्रियेस तब्बल 1 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.
तज्ज्ञांच्या मते, सरकारी शाळांची संख्या घटत असली तरी खासगी आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळा मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. त्यामुळे शिक्षकांसाठी नव्या नोकरीच्या संधी निर्माण होत आहेत. तसेच शिक्षकी पेशा सुरक्षित, सन्मानजनक आणि महिलांसाठी अनुकूल मानला जात असल्याने या क्षेत्राकडे आकर्षण कायम आहे.
राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत घेतल्या जाणाऱ्या या प्रक्रियेसाठी यंदा 1,09,485 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत थोडी घट झाली असली तरी एकूण प्रतिसाद मोठा आहे. बी.एड., एम.एड. आणि एम.पी.एड. या अभ्यासक्रमांसाठी मिळून 1,16,122 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.
दरम्यान, राज्यातील शिक्षण क्षेत्राची परिस्थिती चिंताजनक आहे. अनेक शाळांमध्ये केवळ एकच शिक्षक कार्यरत आहे आणि सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांचे प्रमाणही कमी आहे. तरीही या परिस्थितीतही शिक्षकी पेशाबद्दलचा कल कमी झालेला नाही.
इंग्रजी शाळांची वाढ, ऑनलाईन शिक्षणाच्या संधी आणि डी.एड.नंतर बी.एड.कडे वळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढणे, ही या वाढत्या कलामागची प्रमुख कारणे असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

Comments are closed.