राज्यात गुंतवणूक वाढवणं आणि रोजगाराच्या संधी वाढवण्यासाठी कारखाने अधिनियम १९४८ च्या कलम ५४ आणि महाराष्ट्र दुकाने व आस्थापना अधिनियम २०१७ मध्ये सुधारणा मंजूर झाली. आता कारखान्यातील दैनंदिन कामाचे तास ९ वरून १२ होणार आहेत, तर दुकाने व आस्थापनांमध्ये ९ वरून १० तास काम होईल.
केंद्र सरकारच्या कृती दलाने सुचविलेल्या सुधारणा मंत्रिमंडळाने मान्य केल्या आहेत. कर्नाटक, तमिळनाडू, तेलंगणा, उत्तर प्रदेश, त्रिपुरा या राज्यांनीही हे बदल आधीच केले आहेत. या सुधारणा उद्योगांमध्ये कामकाज थांबविण्याशिवाय चालू राहण्यासाठी मदत करतील आणि कामगारांना योग्य ओव्हरटाईम मोबदला मिळेल.
कारखाने अधिनियम १९४८ मधील कलम ६५ नुसार कामाचे तास १२ करण्यास मंजुरी मिळाली आहे. कलम ५५ मधील सुधारणा अंतर्गत विश्रांतीसाठी सुट्टी ५ तासानंतर ३० मिनिटांऐवजी ६ तासानंतर ३० मिनिटे मिळेल.
महाराष्ट्र दुकाने व आस्थापना अधिनियम २०१७ मध्ये सुधारणा करून २० आणि अधिक कामगार असलेल्या आस्थापनांमध्ये दैनंदिन कामाचे तास १०, विश्रांती कालावधी बदल, तातडीचे काम साडेदहा तासांऐवजी १२ तास, आणि ओव्हरटाईम १२५ तासांऐवजी १४४ तास करण्यास मान्यता मिळाली आहे.

Comments are closed.