महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) मार्फत घेण्यात येणारी महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ ही २८ सप्टेंबर रोजी राज्यभर पार पडणार आहे. यंदा प्रथमच ही परीक्षा यूपीएससीच्या धर्तीवर होणार असली तरी निकाल मात्र जुन्याच पद्धतीनं लागणार असल्यामुळे परीक्षार्थींमध्ये नाराजी आहे.
आत्तापर्यंत (२०२४ पर्यंत) ही परीक्षा वस्तुनिष्ठ स्वरूपात होत होती; पण आता मुख्य परीक्षा पूर्णपणे लेखी पद्धतीनं होणार आहे. यासाठी उमेदवारांना वैकल्पिक विषय घ्यावा लागणार आहे. यूपीएससी साधारण १५-२० दिवसांत निकाल लावते, त्यामुळे विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेसाठी ३-४ महिने तयारीला मिळतात. पण एमपीएससीकडून निकाल प्रक्रियेत बदल न केल्याने विद्यार्थ्यांना तितका वेळ मिळणार नाही.
आयोगानुसार, पूर्व परीक्षेनंतर एका आठवड्यात प्राथमिक उत्तरतालिका प्रसिद्ध केली जाईल. त्यावर आक्षेप मागवले जातील. त्यानंतर दुसरी उत्तरतालिका व अंतिम निकाल जाहीर होईल. या प्रक्रियेला दोन महिने लागतात. पारदर्शकता राखण्यासाठी जुनीच पद्धत ठेवली जात असल्याचं सचिव डॉ. सुवर्णा खरात यांनी स्पष्ट केलं.
दरम्यान, विद्यार्थी संघटनांकडून यूपीएससीसारखी जलद निकाल प्रक्रिया ठेवण्याची मागणी होत आहे. सध्या एमपीएससीचं कामकाज अवघ्या २०० कर्मचाऱ्यांवर सुरू असून, हे मनुष्यबळ अपुरं असल्यामुळे आयोगाने राज्य सरकारकडे आणखी ११९ पदं भरण्याची मागणी केली आहे.