वाहतूक कोंडीत अडकलेल्या परीक्षार्थ्यांसाठी ठाणे शहरात पोलिसांची धावपळ पाहायला मिळत आहे. बारावी व दहावीच्या परीक्षांच्या काळात विद्यार्थ्यांना वेळेत परीक्षा केंद्रावर पोहोचता यावे, यासाठी ठाणे शहर वाहतूक पोलिस विभागाने सुरू केलेल्या विशेष हेल्पलाइनवर अवघ्या दोन दिवसांत २६ विद्यार्थ्यांनी मदतीसाठी संपर्क साधला.
फोन येताच वाहतूक पोलिसांचे रायडर्स तत्काळ घटनास्थळी पोहोचले. सिग्नल मोकळे करणे, पर्यायी मार्ग उपलब्ध करून देणे, गरज पडल्यास वाहन एस्कॉर्ट देत विद्यार्थ्यांना विनाअडथळा परीक्षा केंद्रापर्यंत पोहोचवण्यात आले.
पोलिस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील विविध ठिकाणी ५४ रायडर्स तैनात करण्यात आले असून, संपूर्ण परीक्षाकाळात ही सुविधा सुरू ठेवण्यात आली आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचा ताण कमी झाला असून पालकांनीही समाधान व्यक्त केले आहे.
वाहतूक विभागाने भविष्यातही अशा सामाजिक उपक्रमांद्वारे नागरिकांच्या मदतीसाठी सदैव सज्ज राहण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

Comments are closed.