राज्यात शिक्षकांच्या पदोन्नतीबाबत शालेय शिक्षण विभागाने स्पष्ट भूमिका घेतली असून टीईटी (Teacher Eligibility Test) उत्तीर्ण असणे हे पदोन्नतीसाठी अनिवार्य असल्याचे पुन्हा एकदा ठामपणे जाहीर केले आहे.
पदवीधर शिक्षक, मुख्याध्यापक, समूह साधन केंद्र समन्वयक तसेच विस्तार अधिकारी (शिक्षण) या सर्व पदांवरील पदोन्नतीसाठी टीईटीसह इतर आवश्यक अर्हता पूर्ण असणे बंधनकारक राहणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या अलीकडील निर्णयानुसार, सेवेत असलेले तसेच पदोन्नती इच्छिणारे शिक्षक टीईटी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. निवृत्तीस पाच वर्षे शिल्लक असलेल्या शिक्षकांना टीईटीमधून सूट देण्यात आली असली, तरी पदोन्नती हवी असल्यास त्यांनाही टीईटी पास असणे गरजेचे ठरणार आहे. टीईटी उत्तीर्ण होण्यासाठी दोन वर्षांची मुदत देण्यात आली असून, त्या कालावधीत अट पूर्ण न झाल्यास पदोन्नती देता येणार नाही, असे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.
या निर्णयामुळे शिक्षक संवर्गातील पदोन्नती प्रक्रिया अधिक नियमबद्ध होणार असून गुणवत्तेला प्राधान्य दिले जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

Comments are closed.