इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत शिकवणाऱ्या शिक्षकांसाठी टीईटी (Teacher Eligibility Test) उत्तीर्ण असणे बंधनकारक असल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीच दिला होता.
मात्र, हा नियम मुख्याध्यापकांना लागू होतो की नाही, याबाबत संभ्रम होता. आता माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले असून, मुख्याध्यापकांनाही टीईटी उत्तीर्ण असणे आवश्यक असल्याचे ठामपणे सांगितले आहे.
राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद (NCTE) च्या मार्गदर्शक सूचनांनुसार २०१० पासून टीईटीची अट लागू करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, ५३ वर्षांपर्यंत वय असलेल्या शिक्षकांनाही दोन वर्षांच्या आत टीईटी उत्तीर्ण होणे बंधनकारक आहे. दिलेल्या मुदतीत टीईटी न झाल्यास सक्तीची सेवानिवृत्तीची कारवाई होऊ शकते. तसेच विस्ताराधिकारी, गटशिक्षणाधिकारी, केंद्रप्रमुख आणि मुख्याध्यापक पदोन्नतीसाठीही टीईटी उत्तीर्ण असणे आवश्यक ठरणार आहे.
याचप्रमाणे, निवड व वरिष्ठ वेतनश्रेणीसाठीही टीईटीची अट लागू करण्यात आली आहे. त्यामुळे दीर्घ सेवा पूर्ण केलेल्या अनेक शिक्षकांना आता वेतनवाढीसाठी टीईटी उत्तीर्ण होणे अपरिहार्य ठरले आहे. परिणामी, काही शाळांमध्ये प्रभारी मुख्याध्यापकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
बीएड किंवा डीएड पात्रता असली तरीही, इयत्ता पहिली ते आठवीच्या वर्गांवरील शिक्षकांना टीईटी पास करणे अनिवार्यच आहे. राज्य शासनाने टीईटी उत्तीर्ण व अनुत्तीर्ण शिक्षकांची माहिती संकलित करण्यास सुरुवात केली असून, येत्या काळात या नियमांची काटेकोर अंमलबजावणी केली जाणार आहे.

Comments are closed.