गोंदिया जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांची स्थिती दिवसेंदिवस चिंताजनक होत चालली आहे. जिल्ह्यात एकूण १०३४ शाळा असून, यामध्ये तब्बल ८९,१५६ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. परंतु, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या ७०० हून अधिक पदे रिक्त असल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर थेट परिणाम होत आहे.

विशेष म्हणजे, जिल्ह्यातील अनेक शाळांची इमारत अवस्था इतकी जीर्ण झाली आहे की, विद्यार्थी जीव धोक्यात टाकून शिक्षण घेत आहेत. काही ठिकाणी छत गळत आहे, भिंतींवर तडे गेले आहेत, तर वर्गात बसण्यासाठी पुरेसे डेस्क-बेंचही उपलब्ध नाहीत. यामुळे शिक्षणाचा दर्जा खालावत आहे.
वर्ष २०२५-२६ मध्ये मोठ्या प्रमाणात शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी निवृत्त होणार असल्याने रिक्त पदांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. सध्या प्राथमिक शिक्षण विभागात ६० मुख्याध्यापक, ३५ पदवीधर शिक्षक, आणि ५६० सहायक शिक्षक अशी एकूण ६५५ पदे रिक्त आहेत. माध्यमिक व कनिष्ठ विद्यालयातही अनेक पदे भरली गेलेली नाहीत.
शैक्षणिक कामकाजावर याचा परिणाम स्पष्टपणे दिसतो. जिल्हा परिषद शिक्षण विभागात प्राथमिक व माध्यमिक अधिकारी, दोन्ही उपशिक्षणाधिकारी, लेखाधिकारी पोषण, शिक्षण विस्तार अधिकारी, वरिष्ठ व कनिष्ठ सहायक अशा महत्त्वाच्या प्रशासकीय पदांचीही रिक्तता आहे. या रिक्त पदांमुळे दैनंदिन कार्यालयीन कामकाजात अडथळे निर्माण होत आहेत.
विद्यार्थ्यांच्या बसण्याकरिता आणि अध्यापन साधनांच्या खरेदीसाठी १४ कोटी रुपयांची मागणी शासनाकडे करण्यात आली आहे. याशिवाय, वर्ष २०२५-२६ च्या जिल्हा वार्षिक योजनेत शिक्षण विभागाने २९ कोटी ७३ लाख रुपयांची मागणी केली होती, परंतु शासनाने त्यातील फक्त १४ कोटी ३० लाख रुपये मंजूर केले आहेत. ही रक्कम जिल्ह्याच्या शैक्षणिक गरजांच्या तुलनेत अत्यल्प असल्याचे स्थानिक प्रतिनिधींचे मत आहे.
गोंदिया जिल्हा हा आदिवासी बहुल आणि नक्षलग्रस्त असल्याने शिक्षण पोहोचवणे आधीच आव्हानात्मक आहे. अनेक गावांमध्ये शाळा आहेत, पण त्या जुन्या, मोडकळीस आलेल्या इमारतींमध्ये चालतात. या परिस्थितीत जिल्हा नियोजन समितीतून १५ कोटी ४३ लाख रुपयांचा अतिरिक्त निधी देण्याची मागणी खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या वतीने जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुरेश हर्षे यांनी केली आहे.
उपाध्यक्ष सुरेश हर्षे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “जिल्ह्यात शिक्षकांच्या पदांची मोठ्या प्रमाणावर रिक्तता आहे आणि भौतिक सुविधांचा गंभीर अभाव आहे. शासनाने तात्काळ नवीन शिक्षक भरती प्रक्रिया सुरू करावी आणि रिक्त पदे भरण्यासोबतच इमारती दुरुस्त करण्यासाठी व शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी निधी द्यावा.”

Comments are closed.