उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील निधनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने बुधवारी शासकीय सुटी जाहीर केली. या निर्णयानंतर शालेय शिक्षण विभागाने राज्यातील सर्व शाळांना सुटी जाहीर केली असून, मुंबई विद्यापीठाने दुपारच्या सत्रातील सर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत विद्यापीठाने सर्व संलग्न महाविद्यालयांचे प्राचार्य तसेच सीडीओई (Center for Distance and Online Education) यांना अधिकृत कळवणी केली आहे.

सध्या मुंबई विद्यापीठाच्या हिवाळी सत्राच्या परीक्षा सुरू असून, सर्व महाविद्यालये व परीक्षा केंद्रांवर परीक्षा घेतल्या जात आहेत. मात्र बुधवारी सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन झाल्याने राज्य सरकारने तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करत २८ जानेवारी रोजी शासकीय कार्यालयांना सुटी दिली. त्यानुषंगाने विद्यापीठाने २८ जानेवारी रोजी दुपारच्या सत्रात होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला असून, संबंधित विद्यार्थ्यांना तात्काळ माहिती देण्याच्या सूचना महाविद्यालयांना देण्यात आल्या आहेत.
वाणिज्य व व्यवस्थापन, कला व शिक्षण शाखांशी संलग्न महाविद्यालयांचे प्राचार्य तसेच सीडीओईचे संचालक यांना यासंदर्भात पत्राद्वारे अवगत करण्यात आले आहे. पुढे ढकललेल्या परीक्षांच्या नव्या तारखा लवकरच जाहीर केल्या जातील, असेही विद्यापीठाने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, या दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण विभागाने राज्यातील सर्व शाळांना दुपारच्या सत्रात सुटी जाहीर केली आहे. शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी व शिक्षण निरीक्षकांना पत्राद्वारे याची माहिती दिली आहे.

Comments are closed.