कोल्हापूर महापालिकेत अधिकारी व कर्मचाऱ्यांची तीव्र कमतरता निर्माण झाली असून तब्बल १७४१ पदे रिक्त आहेत. नवीन भरती किंवा कंत्राटी नेमणुका न झाल्याने प्रशासन अतिरिक्त कार्यभारावर चालवावे लागत आहे.
परिणामी एका कर्मचाऱ्यावर दोन ते तीन पदांचा ताण देण्यात आला असून, एकूण ५६ अतिरिक्त कार्यभार अधिकारी-कर्मचाऱ्यांवर सोपवण्यात आले आहेत.
महापालिकेतील विविध विभागांत ही स्थिती असून आरोग्य व सफाई विभागात कर्मचारी असले तरी शहराच्या वाढत्या विस्तारामुळे तेही अपुरे ठरत आहेत. काही विभागांतून कर्मचारी मूळ ठिकाणी परत गेल्याने इतर विभागांचे कामकाज खोळंबले आहे. वर्ग एक व वर्ग दोन अधिकाऱ्यांचीही मोठ्या प्रमाणावर पदे रिक्त असून, अनेक अधिकाऱ्यांकडे एकाच वेळी अनेक विभागांची जबाबदारी देण्यात आली आहे.
नवीन नगरसेवकांकडून विकासकामांची अपेक्षा असताना अपुऱ्या मनुष्यबळामुळे कामांचा निपटारा वेळेत होणे कठीण बनले आहे. यामुळे प्रशासनावर ताण वाढत असून नागरिकांनाही त्याचा फटका बसत आहे. महापालिकेचे कामकाज सुरळीत चालवायचे असेल, तर तातडीने भरती प्रक्रिया राबवून यंत्रणा सक्षम करण्याची गरज असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.

Comments are closed.