राज्यातील तरुण-तरुणींना रोजगाराच्या अधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी कौशल्य विकास विभागाकडून महत्त्वाकांक्षी उपक्रम राबवण्यात येत असून, पुढील दोन वर्षांत मोठ्या प्रमाणात रोजगार आणि उद्योजकतेच्या नव्या संधी निर्माण होतील, असा विश्वास कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी व्यक्त केला. विधान परिषदेत बोलताना त्यांनी सांगितले की, राज्यात तब्बल ३० लाख तरुण-तरुणींसाठी विशेष योजना सुरू करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली कौशल्य विकास क्षेत्रात विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. मॉडेल करिअर सेंटरच्या माध्यमातून २०२५-२६ या वर्षात सुमारे १ लाख १२ हजार तरुणांना वैयक्तिक मार्गदर्शन देण्यात आले आहे.
तसेच, तरुणांना विदेशात रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी मुंबई विद्यापीठ येथे स्वामी विवेकानंद कौशल्य विकास इंटरनॅशनल अकादमी सुरू करण्यात आली असून, राज्यात आणखी सहा ठिकाणी अशा अकादमी कार्यरत आहेत.
या अकादमींमध्ये विदेशी भाषांचे प्रशिक्षण देण्याबरोबरच ईव्ही तंत्रज्ञान, रोबोटिक्स, वेल्डिंग यांसारख्या आधुनिक कौशल्यांचे प्रशिक्षण दिले जात आहे.
कौशल्य विकासासाठी निधीची कोणतीही कमतरता नसून, आशियाई विकास बँकेकडून ४,२०० कोटी रुपये आणि जागतिक बँकेकडून १,४०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.

Comments are closed.