नाशिकमध्ये दहावीच्या परीक्षेच्या शेवटच्या दिवशी काही परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांच्या दप्तरांची तपासणी करण्यात आली असता धक्कादायक प्रकार समोर आले. अनेक विद्यार्थ्यांच्या बॅगमध्ये रोख रक्कम, प्रेमपत्रे, नवीन कपडे, हिरवा चुडा, भेटवस्तू तसेच काही ठिकाणी चाकू व इतर अनुचित वस्तू आढळल्याने शिक्षकही आश्चर्यचकित झाले.
परीक्षा संपल्यानंतर ‘सेलिब्रेशन’च्या नावाखाली काही विद्यार्थी वेगवेगळ्या गोष्टींची तयारी करत असल्याचे दिसून आले. विशेषतः भांडणासाठी वापरल्या जाणाऱ्या वस्तू आणि वैयक्तिक स्वरूपाच्या वस्तूंमुळे विद्यार्थ्यांच्या वर्तनाबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत.
या घटनेमुळे पालकांच्या जबाबदारीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मुलांच्या दप्तरात अशा वस्तू येतात कशा आणि पालकांना त्याची माहिती का नसते, यावर चर्चा सुरू झाली आहे. तज्ज्ञांच्या मते, या वयात मुलांमध्ये बंडखोर प्रवृत्ती वाढू शकते, त्यामुळे पालकांनी संवाद वाढवून लक्ष ठेवणे गरजेचे आहे.
काही शाळांनी संबंधित विद्यार्थ्यांच्या पालकांना बोलावून माहिती दिली असून, अनेक प्रकरणांमध्ये समुपदेशनाची गरज असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Comments are closed.