राज्यात शिक्षण हक्क कायदा (RTE) अंतर्गत खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल व वंचित घटकातील विद्यार्थ्यांसाठी २५ टक्के जागा राखीव ठेवण्यात येतात.
या जागांवरील प्रवेश प्रक्रिया पारदर्शक व वेळेत पूर्ण व्हावी यासाठी शाळांनी ऑनलाईन नोंदणी व कागदपत्र पडताळणी करणे बंधनकारक आहे.
मात्र, उपलब्ध माहितीनुसार राज्यातील अनेक खासगी शाळांनी अद्यापही आरटीई प्रवेशासाठी आवश्यक नोंदणी आणि व्हेरिफिकेशन प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. यामुळे आगामी प्रवेश प्रक्रियेत अडथळे निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन प्राथमिक शिक्षण विभागाने शाळांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे.
त्यानुसार, संबंधित सर्व खासगी शाळांना ३० जानेवारीपर्यंत नोंदणी व पडताळणी पूर्ण करण्यासाठी अंतिम मुदतवाढ देण्यात आली आहे. ही मुदत संपल्यानंतर प्रक्रिया पूर्ण न करणाऱ्या शाळांवर पुढील टप्प्यात कारवाई होण्याची शक्यता असून, त्या शाळांना आरटीई प्रवेश प्रक्रियेत सहभागी होता येणार नाही.
दरम्यान, आरटीई अंतर्गत प्रवेश मिळवण्यासाठी प्रतीक्षेत असलेल्या पालकांसाठीही ही प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची आहे. शाळांची नोंदणी पूर्ण झाल्यानंतरच लॉटरी, जागा वाटप आणि प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रिया सुरू होणार असल्याने, सर्व शाळांनी दिलेल्या वेळेत प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे.

Comments are closed.