रत्नागिरी तालुक्यातील पदवीधर शिक्षकांसाठी महत्त्वाची समायोजन प्रक्रिया अखेर पूर्ण झाली असून १३७ अतिरिक्त शिक्षकांना मोठा दिलासा मिळाला आहे. २०२६ च्या संच मान्यतेनंतर अतिरिक्त ठरलेल्या या शिक्षकांवर परजिल्ह्यात बदली होण्याची शक्यता होती, मात्र आता त्यांना आपल्या जिल्ह्यातच काम करण्याची संधी मिळाली आहे.
देवरूख येथील लोकनेते शामराव पेजे सभागृहात ही प्रक्रिया पार पडली. यामध्ये मराठी माध्यमाचे ११८ आणि उर्दू माध्यमाचे १७ शिक्षकांचा समावेश आहे. या निर्णयामुळे केवळ १३७ शिक्षकांनाच नाही, तर जिल्ह्यातील एकूण १०५७ शिक्षकांवरील परजिल्ह्यात जाण्याचा धोका टळला आहे.
पूर्वी या शिक्षकांना सांगली, सातारा किंवा गडचिरोलीसारख्या दूरच्या जिल्ह्यांमध्ये जावे लागले असते. मात्र प्रशासनाच्या सकारात्मक भूमिकेमुळे त्यांना आपल्या जिल्ह्यातच सेवा देण्याची संधी मिळाली आहे.
विशेष म्हणजे, या प्रक्रियेत ‘वेतन संरक्षण’ आणि ‘रिव्हर्शन’चा लाभ देण्यात आल्याने हा निर्णय पूर्णपणे शिक्षकहिताचा ठरला आहे. ही संपूर्ण प्रक्रिया पारदर्शकपणे पार पडली असून प्रशासनाच्या कामगिरीचे कौतुक होत आहे.
या वेळी सभापती प्रवीण पांचाळ, उपसभापती गजानन धनावडे, गटविकास अधिकारी शेळके, गटशिक्षणाधिकारी डुबल यांसह शिक्षण विभागातील अधिकारी उपस्थित होते. मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांच्या सकारात्मक भूमिकेमुळे ही प्रक्रिया यशस्वी झाली.

Comments are closed.