बेळगाव जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांसाठी एक चांगली बातमी आलीय! ज्या कर्मचाऱ्यांनी रिक्त पदांवर सलग ५ वर्ष सेवा बजावलीये, त्या वॉटरमन, स्वच्छता कर्मचारी किंवा शिपायांना आता थेट पदोन्नती मिळणार आहे. अशी सूचना जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी दिली.
त्यांनी सांगितलं की, करसंकलन आणि डेटा एंट्री पदं रिक्त असतील तर या कर्मचाऱ्यांना त्या पदांवर बढती देऊन नियुक्ती करावी. त्याचबरोबर, दररोज ध्वजारोहण करणाऱ्यांना मानधन देण्याचंही सुचवलं गेलंय.
मृत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपा तत्त्वावर नोकरीसाठी प्रस्ताव लवकरात लवकर द्यावेत, असंही शिंदे म्हणाले. कचरा व्यवस्थापनावरही त्यांनी जोर दिला — प्रत्येक घरातून शुल्क घेऊन महिला संघ आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांना मानधन दिलं जाईल.
सर्व ग्रामपंचायतींनी घनकचरा व्यवस्थापन आणि स्वच्छतेला सर्वोच्च प्राधान्य द्यावं, तसेच दर महिन्याला तक्रार निवारण बैठक घेऊन माहिती जिल्हा परिषदेकडे सादर करावी, असं त्यांनी स्पष्ट केलं.
या बैठकीत उपसचिव बसवराज हेग्गनायक, सहसचिव राहुल कांबळे, तसेच विविध तालुका पंचायतींचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

Comments are closed.