“लाडकी बहीण” योजनेचा गैरवापर थांबवण्यासाठी नाशिक विभागात सरकारी खात्यांनी शोध मोहीम सुरू केलीय. आता अपात्र बहिणींचं पाणी फोडायला अंगणवाडी सेविकाचं पथक गावागावात फिरतंय.
नाशिक विभागात सुमारे ४६ लाख महिलांनी या योजनेचा लाभ घेतला. पण त्यातल्या जवळपास पाच लाख बहिणी अपात्र ठरू शकतात, अशी शक्यता वर्तवली जातेय. सेविका घरोघरी जाऊन – आधार कार्ड, उत्पन्न, चारचाकी गाडी आहे का, सरकारी नोकरीत आहेत का, अशा सगळ्या मुद्द्यांवर चौकशी करतायत.
गेल्या वर्षी राखी पोर्णिमेला योजनेचा पहिला हप्ता खात्यात जमा झाला. त्याआधी लाखोंनी अर्ज केले. पण आता लक्षात आलंय की काही सरकारी नोकरदार, अगदी पुरुषसुद्धा या योजनेचा फायदा घेतायत! त्यामुळे सरकारनं ही तपासणी अधिक कडक केलीय.
जिल्हानिहाय आकड्यांनुसार –
नाशिक: १५.२५ लाख लाभार्थी, १.५ लाखांची तपासणी
अहिल्यानगर: ११.२६ लाख, १.२५ लाख
जळगाव: १०.३५ लाख, ९२ हजार
धुळे: ५.४ लाख, ७३ हजार
नंदुरबार: ४.२२ लाख, ५३ हजार
एक महिन्यात सगळी पडताळणी पूर्ण व्हावी, असा आदेश दिला गेलाय. तपासणीत दोषी आढळलेल्या महिलांवर कारवाई होणार, आणि त्यांच्याकडून घेतलेले पैसेही परत घेण्याची शक्यता आहे.

Comments are closed.