रायगड जिल्ह्यात तब्बल १,०९१ पोलीस पाटील पदे रिक्त असल्याने अनेक गावे पोलीस पाटीलविना आहेत. गावांचे कायदा-सुव्यवस्था रक्षण, गुन्ह्यांची माहिती पोलिसांना पोहोचवणे, निवडणुकांमध्ये मदत करणे, आपत्कालीन परिस्थितीत प्रतिसाद देणे अशी महत्त्वाची कामे करणारे पोलीस पाटील उपलब्ध नसल्याने गाव-वाड्यांतील प्रशासनाचा दुवा कमकुवत झाला आहे.

सध्या मंजूर १,९९५ पदांपैकी केवळ ९०४ पोलीस पाटील कार्यरत असल्याने एका पाटलाकडे दोन ते तीन गावांची जबाबदारी आहे. त्यामुळे गुन्ह्यांची माहिती वेळेत पोलिस व महसूल प्रशासनापर्यंत पोहोचवणे अवघड झाले आहे. काही पोलीस पाटील निवृत्त झाल्यानंतर त्यांच्या जागी भरती न झाल्याने रिक्त पदांची संख्या वाढली आहे.
कोरोना काळात पोलीस पाटील यांनी गावागावात जाऊन जनजागृती, सुरक्षा आणि प्रशासनाला मदत करण्याचे मोलाचे काम केले होते. त्यामुळे प्रशासन आणि नागरिकांमधील प्रमुख दुवा म्हणून त्यांची भूमिका महत्त्वाची ठरते.
पोलीस पाटील संघटनांकडून अनेक वर्षांपासून या रिक्त पदांची तत्काळ भरती करण्याची मागणी होत असली तरी अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. परिणामी, गावांतील शांतता राखणे, गुन्हे टाळणे आणि निवडणूक कामकाजात मदत करताना विद्यमान पोलीस पाटील यांच्यावर प्रचंड ताण येत आहे.
संघटनेने शासनाला पुन्हा एकदा आवाहन केले आहे की रायगडमधील सर्व रिक्त पोलीस पाटील पदे तातडीने भरून गावांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक दुवा सक्षम करण्यात यावा.

Comments are closed.