देशातील अग्रगण्य प्रोफेशनल सर्व्हिसेस कंपनी PwC इंडिया ने मंगळवारी आपले ‘व्हिजन 2030’ जाहीर करत रोजगार आणि व्यवसाय क्षेत्रात मोठा बदल घडवून आणण्याचा संकल्प केला आहे. या महत्त्वाकांक्षी योजनेत, कंपनीने पुढील 5 वर्षांत 20 हजार नव्या नोकऱ्या निर्माण करण्याचे लक्ष्य निश्चित केले आहे. यासोबतच कंपनीचे एकूण उत्पन्न तीन पटीने वाढवण्याचा निर्धारही करण्यात आला आहे, ज्यामुळे देशातील रोजगार आणि उद्योग क्षेत्राला मोठा चालना मिळणार आहे.

PwC इंडिया आपल्या सेवा केवळ मेट्रो शहरांपुरत्याच मर्यादित ठेवणार नाही, तर देशातील टियर-2 आणि टियर-3 शहरांमध्येही व्यवसाय विस्तार करणार आहे. यामुळे लहान शहरांतील आणि ग्रामीण भागातील प्रतिभावान युवक-युवतींना जागतिक दर्जाच्या संधी उपलब्ध होतील. या धोरणातून कंपनी अधिकाधिक ग्राहकांपर्यंत पोहोचेल आणि वेगाने वाढणाऱ्या स्पर्धात्मक बाजारपेठेत आपले स्थान मजबूत करेल.
कंपनीने जाहीर केले आहे की दरवर्षी आपल्या महसुलातील 5 टक्के रक्कम तंत्रज्ञान विकास, क्षमता वृद्धी, कर्मचारी कौशल्यवृद्धी आणि प्रशिक्षणावर खर्च केली जाईल. कंपनीचे चेअरमन संजिव कृष्णन यांच्या मते, “आम्ही फ्यूचर-रेडी वर्कफोर्स तयार करत आहोत, जिथे महिलांच्या नेतृत्वाला विशेष प्राधान्य दिले जाईल आणि सर्वसमावेशक, समृद्ध कार्यपरिसर तयार केला जाईल.” त्यांनी पुढे सांगितले की, कंपनीचे लोक कॅम्पसपासून बोर्डरूमपर्यंत प्रगती करण्याची क्षमता ठेवतील.
सहा प्रमुख सेक्टरवर विशेष लक्ष
PwC इंडिया आगामी काळात सहा महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रीत करणार आहे –
- आर्थिक सेवा (Financial Services)
- आरोग्य सेवा (Healthcare)
- औद्योगिक आणि उत्पादन क्षेत्र (Industrial & Manufacturing)
- ऑटो टेक्नोलॉजी (Auto Technology)
- मीडिया (Media)
- दूरसंचार (Telecom)
या क्षेत्रांत तंत्रज्ञानाचा वापर, बिझनेस मॉडेल्स, व्यवस्थापन पद्धती आणि संशोधन प्रक्रियेत मोठे बदल घडवणे अत्यावश्यक आहे. PwC च्या मते, या बदलांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढीच्या आणि नवनवीन संधींची शक्यता आहे.
संजिव कृष्णन यांनी स्पष्ट केले की, “पुढील 5 वर्षे भारतासाठी निर्णायक ठरणार आहेत. या काळात PwC ला भारताच्या प्रगतीत महत्त्वाची भूमिका निभवायची आहे. ‘व्हिजन 2030’ हे केवळ कंपनीसाठीच नव्हे तर भारतासाठी धाडसी परिवर्तन घडवून आणण्याचे साधन आहे.” त्यांनी हेही सांगितले की कंपनी डिजिटल आणि तंत्रज्ञान क्षमतांना आपल्या सेवांच्या केंद्रस्थानी ठेवून बाजारात वेगळेपण आणणार आहे.
नव्या तंत्रज्ञान आणि AI मध्ये गुंतवणूक
PwC इंडिया तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित सेवा, नवीन बाजारपेठा आणि नवकल्पना यामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करणार आहे. या योजनेद्वारे कंपनी आपली कर्मचारी संख्या सध्याच्या पातळीवरून 50,000 पर्यंत वाढवण्याचा मानस बाळगते.
‘व्हिजन 2030’ मुळे केवळ रोजगारनिर्मितीच नव्हे, तर उद्योग, तंत्रज्ञान आणि कौशल्य विकास या सर्वच क्षेत्रांमध्ये देशाला मोठी गती मिळण्याची शक्यता आहे. PwC चा हा उपक्रम भारताच्या विकसित भारत 2047 या स्वप्नाशी सुसंगत मानला जातो.

Comments are closed.