राज्यातील दुर्गम व आदिवासी भागांतील आरोग्यसेवा अधिक सक्षम करण्यासाठी महाराष्ट्र आरोग्य विभागाने नवीन भरती धोरण लागू केले आहे. या निर्णयामुळे आरोग्य संस्थांमधील रिक्त पदे भरण्यावर विशेष भर देण्यात येणार आहे.
यानुसार, आरोग्य विभागातील नवीन पदभरती तसेच सेवांतर्गत पदव्युत्तर (PG) पदवी उत्तीर्ण उमेदवारांना प्रथम आदिवासी व दुर्गम भागात नियुक्ती दिली जाईल. तेथील रिक्त पदे भरल्यानंतरच बिगर आदिवासी भागांतील पदभरती करण्यात येणार आहे.
राज्यातील आदिवासी व दुर्गम जिल्ह्यांमध्ये वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचा अभाव कायम असून अनेक पदे रिक्त राहतात. ही परिस्थिती लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे तज्ज्ञ डॉक्टरांसह सर्व संवर्गातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे प्राधान्याने भरली जाणार आहेत.
तसेच, यापुढे बिगर आदिवासी भागात सेवा दिलेल्या आरोग्य अधिकाऱ्यांनाही आदिवासी व दुर्गम भागात सेवा देणे बंधनकारक राहणार असल्याने त्या भागातील आरोग्य सुविधांमध्ये लक्षणीय सुधारणा होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

Comments are closed.