महानगरपालिका निवडणुकीनंतरच लाडकी बहीण योजनेचे ३,००० रुपये वितरित करावेत, अशी मागणी काँग्रेसने राज्य निवडणूक आयोगाकडे पत्राद्वारे केली आहे.
या भूमिकेवरून मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला असून, “काँग्रेसचा लाडक्या बहिणींविरोधातील खरा चेहरा पुन्हा एकदा समोर आला आहे,” असा आरोप त्यांनी केला आहे.
बावनकुळे म्हणाले की, महायुती सरकारने सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेमुळे महिलांच्या चेहऱ्यावर आनंद दिसू लागला आहे. मात्र हा आनंद काँग्रेसला सहन होत नसून, त्यामुळेच ही योजना थांबवण्यासाठी आधी न्यायालयात आणि आता निवडणूक आयोगाकडे धाव घेतली जात आहे. बहिणींच्या खात्यात जमा होणाऱ्या पैशांनाच “लाच” म्हणणे ही काँग्रेसची विकृत मानसिकता दर्शवते, असे त्यांनी ठणकावून सांगितले.
काँग्रेसने आपल्या पत्रात असा दावा केला आहे की, डिसेंबर २०२५ आणि जानेवारी २०२६ चे पैसे निवडणुकीपूर्वी एकत्र देणे हे आदर्श आचारसंहितेचा भंग असून महिला मतदारांवर प्रभाव टाकणारे आहे. मात्र काँग्रेसचा योजनेला विरोध नसून, पैसे फक्त निवडणूक संपल्यानंतरच द्यावेत, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.
दरम्यान, भाजप नेत्या चित्रा वाघ यांनीही काँग्रेसवर टीका करत, “लाडक्या बहिणींच्या सन्मानालाच काँग्रेस लाच म्हणते,” असे म्हटले आहे. निवडणुकीच्या नावाखाली महिलांचा हक्काचा पैसा रोखण्याचा हा डाव असून, याचे उत्तर लाडक्या बहिणी योग्य वेळी देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

Comments are closed.