येत्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक महानगरपालिकेने मोठा निर्णय घेतला आहे. शहरातील सुरक्षाव्यवस्था आणि पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी अग्निशमन दलातील २४६ पदे आणि तांत्रिक संवर्गातील अभियंत्यांच्या १४० पदांची भरती लवकरच करण्यात येणार आहे. या भरती प्रक्रियेची जबाबदारी नामांकित संस्था ‘टी.सी.एस.’ (Tata Consultancy Services) यांच्याकडे सोपविण्यात आली आहे, जेणेकरून निवड प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक राहील.

महापालिकेच्या ‘क’ वर्गीय आस्थापना परिशिष्टावरील ७,७२५ मंजूर पदांपैकी सध्या सुमारे ३,५०० पेक्षा अधिक पदे रिक्त आहेत. त्यामुळे शहरातील अनेक विभागांवर कामाचा ताण वाढला असून, ही भरती झाल्यानंतर कर्मचारी संख्या वाढून कार्यक्षमतेत सुधारणा होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
नाशिक महापालिकेचा ‘ब’ वर्गात समावेश झाल्यानंतर सुधारित आकृतीबंध शासनाच्या मान्यतेसाठी सादर करण्यात आला आहे. मात्र, या आकृतीबंधास अद्याप शासनाची औपचारिक संमती मिळालेली नाही. त्यामुळे काही पदांच्या भरतीला थोडा विलंब झाला आहे.
तथापि, आगामी कुंभपर्व लक्षात घेऊन प्रशासनाने या भरती प्रक्रियेला वेग देण्याचे ठरवले आहे. अग्निशमन दलातील मनुष्यबळ वाढल्यास शहरातील आपत्कालीन सेवांमध्ये तत्परता वाढेल आणि नागरिकांना अधिक चांगली सुविधा मिळेल, असा विश्वास महापालिकेतील अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

Comments are closed.