१ डिसेंबरपासून दुचाकी चालकांसाठी कडक वाहतूक नियम लागू होणार आहेत. रस्ते अपघात कमी व्हावेत आणि ई-चलन प्रणाली अधिक प्रभावी व्हावी म्हणून केंद्र सरकारने मोटार वाहन दंड नियमांमध्ये मोठे बदल केलेत.
मार्च २०२५ पासून लागू असलेल्या या दुरुस्त्यांनुसार आता साध्या चुका केल्या तरी पूर्वीपेक्षा दहापट दंड भरावा लागू शकतो.
नवीन नियमांमध्ये हेल्मेट न घालणं, ट्रिपलसीट बसणं, सिग्नल मोडणं, मोबाईल वापरणं किंवा लायसन्सशिवाय वाहन चालवणं यासारख्या उल्लंघनांसाठी ₹१,००० ते ₹५,००० पर्यंत दंड ठरवलाय. दारू पिऊन वाहन चालवल्यास ₹१०,००० दंड आणि ६ महिने तुरुंगवासाची तरतूद आहे. अल्पवयीन मुलाने वाहन चालवल्यास २५,००० दंड आणि पालकांना ३ वर्षांचा तुरुंगवासही होऊ शकतो.
ई-चलन भरलं नाही तरही सरकारनं कठोर पावलं उचलली आहेत. ४५ दिवसांत दंड न भरल्यास तुमचे वाहन आणि लायसन्स ‘नॉन-ट्रान्झॅक्टेबल’ होणार म्हणजेच कुठलीही RTO सेवा मिळणार नाही. ३ महिन्यांत दंड न भरल्यास लायसन्स रद्द करण्याचीही तरतूद आहे.
महाराष्ट्रात ई-चलन भरण्यासाठी परिवहन पोर्टल किंवा महाराष्ट्र ई-चलन साइटवर जाऊन ऑनलाइन पेमेंट करता येतं. UPI, कार्ड, नेटबँकिंग सर्व पर्याय उपलब्ध आहेत. ऑफलाइन दंडही ट्रॅफिक अधिकाऱ्यांकडे किंवा पोलीस मुख्यालयात भरता येतो.
सरकारचे हे नियम वाहतूक शिस्त सुधारण्यासाठी महत्त्वाचे आहेत. त्यामुळे प्रत्येक वाहनचालकाने नियम पाळणं गरजेचं आहे—कारण आता नियम मोडणं खिशाल फार महाग पडणार आहे!

Comments are closed.