नीट-पीजी पदव्युत्तर प्रवेश प्रक्रियेत यंदा मोठा धक्का बसला आहे. राज्य कोट्यातील पहिल्या फेरीत तब्बल ३,१९१ विद्यार्थ्यांना फक्त विषयाचा प्राधान्यक्रम न भरल्यामुळे यादीतून बाहेर पडावे लागले.
हे प्रमाण तब्बल ५७.४६% इतके आहे. आता ही संपूर्ण गट दुसऱ्या फेरीसाठी पात्र ठरणार असून, त्यांना नव्याने विषयांची पसंती नोंदवावी लागणार आहे.
सीईटी कक्षाने जाहीर केलेल्या निवड यादीत एकूण ५,५५३ विद्यार्थ्यांची नोंद होती. त्यापैकी फक्त २,३६२ विद्यार्थ्यांनाच महाविद्यालय मिळाले. आणि यंदा राज्यात मेडिसिन, सर्जरी आणि भूलतज्ज्ञ या शाखांना सर्वाधिक प्रतिसाद मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे.
दुसरीकडे, देशभरात लोकप्रिय असलेली रेडिओलॉजी शाखा राज्यातील पहिल्या यादीत नवव्या क्रमांकावर सरकली असून, केवळ १२३ विद्यार्थ्यांनी तिला पसंती दिली. त्याहूनही कमी प्रतिसाद अॅनॅटॉमी आणि हेमेटॉलॉजीला मिळाला आहे.
३,१९१ विद्यार्थ्यांनी निवड भरताना विषयाचाच क्रम न दिल्याने प्रवेश प्रक्रियेत ही अनपेक्षित परिस्थिती निर्माण झाली. आता हे सर्व विद्यार्थी दुसऱ्या फेरीत आपली पसंती नव्याने नोंदवणार आहेत.
दरम्यान, यावर्षी विषय निवडीत मेडिसिनला २६३, भूलतज्ज्ञ शाखेला २४०, तर सर्जरीला २३० विद्यार्थ्यांची पसंती मिळाली आहे. स्त्रीरोग-प्रसूतीतज्ज्ञ शाखेलाही १९० जणांनी निवड दिली.

Comments are closed.