नाशिक महानगरपालिकेत आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मनुष्यबळ वाढविण्यासाठी मोठ्या प्रमाणात भरती प्रक्रिया सुरू होत आहे. या अंतर्गत अग्निशमन विभागातील २४६ पदे आणि तांत्रिक संवर्गातील १४० अभियंता पदे भरली जाणार आहेत.

ही भरती टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) मार्फत पार पडणार असून, अनेक वर्षांपासून रखडलेली भरती प्रक्रिया अखेर गती घेते आहे. महापालिकेच्या ‘क’ वर्गीय आस्थापना परिशिष्टावरील ७७२५ मंजूर पदांपैकी साडेतीन हजार पदे सध्या रिक्त आहेत. या प्रक्रियेने नाशिक महापालिकेच्या कामकाजाला नवी उभारी मिळणार आहे.
शासनाने तांत्रिक संवर्गातील १४० पदे आणि अग्निशमन विभागातील २४६ पदांच्या भरतीसाठी आस्थापना खर्च मर्यादा शिथिल करण्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे आता भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे आणि टीसीएसमार्फत या प्रक्रियेला अंतिम टप्प्यावर नेले जाणार आहे.
या भरतीमध्ये उप अभियंता (यांत्रिकी, विद्युत), सहाय्यक अभियंता, कनिष्ठ अभियंता, स्टेशन ऑफिसर, सब ऑफिसर आणि फायरमन यांसारखी महत्त्वाची पदे समाविष्ट आहेत. कुंभमेळ्यापूर्वी शहराच्या सुरक्षेची आणि सुविधा व्यवस्थेची तयारी मजबूत करण्यासाठी ही भरती अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.

Comments are closed.