नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, यामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार आहे. मात्र, गेल्या काही हप्त्यांपासून या योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या सातत्याने कमी होत असल्याचे चित्र समोर येत आहे. कृषी विभागाच्या माहितीनुसार, योजनेच्या पात्रतेसाठी ठरवलेल्या नव्या आणि कठोर निकषांमुळे अनेक शेतकरी योजनेच्या लाभापासून वंचित राहिले आहेत.

२०व्या हप्त्यात सुमारे ९६ लाख शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देण्यात आले होते, तर २१व्या हप्त्यात ही संख्या घटून सुमारे ९२ ते ९३ लाखांपर्यंत आली आहे. आता नमो शेतकरी महासन्मान निधीच्या आठव्या हप्त्याची रक्कम सुमारे ९० लाख ४१ हजार २४१ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याची माहिती समोर आली आहे. शासनाने हप्ते नियमित व जलद पद्धतीने वितरीत होण्यासाठी प्रक्रिया अधिक सुलभ केली असून, याचा थेट परिणाम शेतकऱ्यांच्या दैनंदिन खर्चावर सकारात्मक होईल.
दरम्यान, लाभार्थी यादी शुद्ध करण्यासाठी शासनाने कठोर नियम लागू केले आहेत. यात मृत लाभार्थींच्या सुमारे २८ हजार नोंदी आणि दुहेरी लाभ घेणाऱ्या सुमारे ३५ हजार नोंदी वगळण्यात आल्या आहेत. तसेच, कुटुंबातील केवळ एका व्यक्तीलाच लाभ देण्याची अट लागू केल्याने नवरा–बायको दोघांनाही लाभ मिळणाऱ्या कुटुंबांना मोठा फटका बसला आहे. याशिवाय, आयटीआर भरणारे तसेच सेवा क्षेत्रात कार्यरत असलेले शेतकरी विशेष तपासणीच्या रडारवर असून, त्यामुळे अनेक प्रामाणिक शेतकऱ्यांनाही अतिरिक्त कागदपत्रांची पूर्तता करावी लागत आहे.
आठवा हप्ता नेमका कधी जमा होणार, याबाबत शेतकऱ्यांमध्ये उत्सुकता असून, सध्याच्या परिस्थितीचा विचार करता डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात हा निधी शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. प्रशासनाची तयारी अंतिम टप्प्यात असून, शेतकऱ्यांनी आपल्या बँक खात्याशी संबंधित तपशील अद्ययावत ठेवावेत, असे आवाहन करण्यात येत आहे.

Comments are closed.