राज्यातील मोठ्या पायाभूत प्रकल्पांना चालना देण्यासाठी महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळात (MSIDC) मनुष्यबळ वाढवण्याचा सरकारने मोठा निर्णय घेतलाय.
सार्वजनिक बांधकाम विभागाने अखेर एमएसआयडीसीचा आकृतीबंध निश्चित केल्यामुळे आता ४४ नियमित आणि ३२ बाह्ययंत्रणेद्वारे, असा मिळून ७६ पदांसाठी भरती होणार आहे.
राज्यात रस्ते, रेल्वे, बंदरे, विमानतळ, मेट्रो आणि वीज अशा २२ महत्त्वाच्या प्रकल्पांसाठी हे महामंडळ २०२३ मध्ये स्थापन झालं. पण कायमस्वरूपी पदं नसल्याने कामात अडथळे येत होते. मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीनंतर हा अडथळा दूर झाला.
या भरतीत मुख्य वित्तीय अधिकारी व वित्त सल्लागारपदांसाठी आर्थिक क्षेत्रातील तज्ज्ञांना प्राधान्य देण्यात येणार आहे. तसेच प्रतिनियुक्तीलाही प्राधान्य द्यायचं ठरलं आहे. अधिकारी उपलब्ध नसल्यास तज्ज्ञांना कंत्राटी पद्धतीने नियुक्त करता येईल, अशी मुभा देण्यात आली आहे.
बाह्ययंत्रणेद्वारे भरतीत मल्टिटास्किंग स्टाफला प्राधान्य देण्यात यावं, अशीही स्पष्ट सूचना आहे. तर व्यवस्थापकीय संचालक, मुख्य अभियंता, CFO, CAO, अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, कनिष्ठ अभियंता, वरिष्ठ लेखाधिकारी यांसारखी महत्त्वाची पदं नियमित भरतीतून भरण्यात येणार आहेत.
या निर्णयामुळे एमएसआयडीसीला आवश्यक मनुष्यबळ अखेर मिळणार असून मोठ्या प्रकल्पांच्या गतीत भर पडणार आहे.

Comments are closed.