नवीन वर्षापासून राज्याच्या वीज वितरण व्यवस्थेत आमूलाग्र बदल घडवण्यासाठी महावितरणकडून ‘महापरिवर्तन’ या महत्त्वाकांक्षी परिवर्तन मोहिमेची अंमलबजावणी सुरू होत आहे. या उपक्रमातून आर्थिक शिस्त, तांत्रिक सक्षमता आणि कार्यपद्धतीत मूलभूत सुधारणा घडवण्यावर भर देण्यात आला आहे.
पुढील १८ महिन्यांत २,५०० कोटी रुपयांचा अतिरिक्त रोख नफा मिळवणे आणि २०३०पर्यंत १५ हजार कोटींच्या नफ्याचे लक्ष्य गाठणे असा या योजनेचा उद्देश आहे.
‘महाशक्ती’ म्हणून ओळखला जाणारा हा कार्यक्रम नव्याने स्थापन करण्यात आलेल्या ट्रान्सफॉर्मेशन ऑफिसमार्फत राबवला जाणार असून, प्रगतीवर सातत्याने लक्ष ठेवले जाईल. कृत्रिम बुद्धिमत्ता, स्मार्ट मीटरचे विश्लेषण आणि डेटा-आधारित देखरेखीच्या माध्यमातून वीज चोरी आणि अकार्यक्षमता रोखली जाणार आहे. त्यामुळे सध्या १६ टक्क्यांवर असलेले तांत्रिक व व्यावसायिक नुकसान १० टक्क्यांपर्यंत खाली आणण्याचे उद्दिष्ट आहे.
या मोहिमेत वीज पुरवठ्याची विश्वासार्हता आणि गुणवत्ता सुधारण्याला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे. आधुनिक उपकरणांच्या मदतीने वीज खंडित होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.
कृषी क्षेत्रासाठी स्वतंत्र व्यवस्थापन युनिट स्थापन करून शेती वीज पुरवठा अधिक सुसूत्र केला जाणार आहे. त्याचबरोबर सौर ऊर्जेचा मोठ्या प्रमाणावर वापर, पंप स्टोरेज प्रकल्प आणि सौर छत योजनांमुळे ग्राहकांना दिलासा मिळणार असून, राज्याची वीज व्यवस्था आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

Comments are closed.