राज्य लोकसेवा आयोगाने (MPSC) वस्तुनिष्ठ बहुपर्यायी परीक्षांच्या उत्तरपत्रिकेच्या पद्धतीत महत्त्वाचे बदल जाहीर केले आहेत. १ मार्च २०२६ नंतर होणाऱ्या सर्व परीक्षांसाठी हे नवे नियम लागू असतील.
आता प्रत्येक प्रश्नासाठी उमेदवारांना चारऐवजी पाच पर्याय दिले जाणार असून, त्यातील किमान एक पर्याय रंगविणे बंधनकारक राहणार आहे.
चारही पर्याय योग्य वाटत नसतील, तर उमेदवाराने पाचव्या (None of the above) पर्यायाचे वर्तुळ रंगवणे आवश्यक असेल. जर पाचपैकी एकही पर्याय निवडला नाही, तर त्या प्रश्नासाठी २५ टक्के गुण वजा केले जाणार आहेत. त्यामुळे उत्तर नसेल तरी पर्याय निवडणे आता अनिवार्य ठरणार आहे.
आयोगाने उत्तरपत्रिकेची रचना देखील बदलली असून ती भाग १ आणि भाग २ अशी असेल. भाग १ मध्ये फक्त उत्तरे नोंदवायची असतील, तर भाग २ मध्ये उमेदवाराचे नाव, बैठक क्रमांक, प्रश्नपत्रिका क्रमांक, विषय कोड आणि स्वाक्षरी अशी माहिती द्यावी लागणार आहे. परीक्षा संपल्यानंतर पर्यवेक्षकांकडून दोन्ही भाग वेगळे करण्यात येणार असून, यामुळे मूल्यमापन प्रक्रियेत गोपनीयता राखली जाणार आहे.
तसेच उत्तरपत्रिकेवर स्वाक्षरी नसणे, काळ्या बॉलपेनशिवाय इतर पेन वापरणे, अनावश्यक मजकूर किंवा चिन्हे लिहिणे अशा चुका झाल्यास उत्तरपत्रिका अवैध ठरवली जाणार असल्याचेही आयोगाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे उमेदवारांनी आता उत्तरपत्रिका भरताना विशेष काळजी घेणे आवश्यक ठरणार आहे.

Comments are closed.