महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) वतीने रविवारी, २२ मार्च रोजी ‘औषध निरीक्षक, अन्न व औषधे प्रशासकीय सेवा गट-ब चाळणी परीक्षा २०२५’ यशस्वीपणे पार पडली. छत्रपती संभाजीनगर शहरातील विविध परीक्षा केंद्रांवरून आठ हजारांहून अधिक उमेदवारांनी ही परीक्षा दिली. या परीक्षेसाठी एकूण ११,६४० उमेदवारांनी नोंदणी केली होती, त्यापैकी ८,०७१ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली, तर ३,५६९ उमेदवार गैरहजर राहिले. म्हणजेच ६९.३३ टक्के उपस्थिती तर ३०.६७ टक्के गैरहजेरी नोंदवण्यात आली.

आयोगाने सुधारित कार्यपद्धतीनुसार परीक्षार्थींना परीक्षा सुरू होण्याच्या दीड तास आधीच केंद्रात प्रवेश देण्याचे निर्देश दिले होते. त्यामुळे अनेक विद्यार्थी सकाळी नऊ वाजल्यापासूनच केंद्रांवर दाखल झाले होते. काही उमेदवार तर नियोजित वेळेपेक्षा दोन तास आधीच केंद्रावर पोहोचले होते. परीक्षा सुरू होण्याच्या अर्धा तास आधी केंद्रांचे मुख्य प्रवेशद्वार बंद करण्यात आले. यामुळे काही मिनिटे उशिराने आलेल्या काही उमेदवारांना प्रवेश नाकारण्यात आल्याचीही चर्चा रंगली.
ही परीक्षा सकाळी ११ ते १२ या वेळेत घेण्यात आली. छत्रपती संभाजीनगरमधील ३६ शाळा व महाविद्यालयांमध्ये परीक्षा केंद्रांची व्यवस्था करण्यात आली होती. परीक्षेच्या सुरळीत आयोजनासाठी एकूण १,२३४ अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. परीक्षेचे नियोजन आणि अंमलबजावणी काटेकोरपणे करण्यात आल्याचे दिसून आले.

Comments are closed.