राज्यातील बेरोजगार युवकांसाठी मोठी दिलासादायक बातमी असून, राज्य शासनाकडून लवकरच सुमारे ७० हजार पदांची भरती प्रक्रिया सुरू केली जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. यापैकी २० हजार पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मार्फत भरण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या सेवा प्रवेश नियमावली सुधारणा बैठकीत त्यांनी ही माहिती दिली.

मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, ही भरती टप्प्याटप्प्याने पारदर्शक पद्धतीने राबवली जाईल आणि विविध विभागांतील रिक्त पदे भरल्यामुळे प्रशासनाची कार्यक्षमता वाढेल. भरती प्रक्रियेबाबत युवकांच्या मनात कोणतीही शंका राहू नये यासाठी डिजिटल व ऑनलाइन पडताळणी प्रणाली विकसित करण्यावर भर दिला जाणार आहे. पासपोर्टप्रमाणे संवेदनशील कागदपत्रांची ऑनलाइन पडताळणी शक्य असल्याने, इतर भरती प्रक्रियेतही डिजीलॉकर आणि ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
राज्य शासनाच्या सेवा प्रवेश नियमावलीत आवश्यक बदल करून भरती प्रक्रिया अधिक वेगवान, पारदर्शक आणि विश्वासार्ह करण्याचा निर्णय लवकरच मंत्रिमंडळ बैठकीत घेतला जाणार आहे. विविध विभागांनी एकत्रितपणे प्रशासन सुधारणा यशस्वी करण्यासाठी पुढाकार घ्यावा, तसेच भरती करताना आवश्यक कौशल्ये, पात्रता आणि कामाच्या स्वरूपानुसार निर्णय घेण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.

Comments are closed.