राज्यातील आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने मोठा निर्णय घेतला आहे. येत्या ३१ मार्चपर्यंत राज्यभर ९ विशेष आरोग्य मोहिमा राबविण्यात येणार असून, सिकलसेल, रक्तक्षय, कुष्ठरोग, क्षयरोग व मलेरिया निर्मूलनासह ग्रामीण आरोग्य संस्थांच्या कार्यान्वयनावर विशेष भर दिला जाणार आहे.
या अभियानाअंतर्गत २१ जिल्ह्यांत ० ते ४० वर्षे वयोगटातील नागरिकांची सिकलसेल तपासणी केली जाईल. तपासणीनंतर गावनिहाय रुग्ण व वाहकांची यादी तयार करून आवश्यक औषधोपचार, रक्तपुरवठा व समुपदेशन दिले जाणार आहे. राष्ट्रीय बाल सुरक्षा कार्यक्रमात मागील दोन वर्षांत गंभीर आजार निदान झालेल्या अंगणवाडी व शाळेतील बालकांना उपचार व शस्त्रक्रिया उपलब्ध करून देण्यात येतील.
राज्यातील तीव्र रक्तक्षय असलेल्या सर्व नोंदणीकृत गरोदर मातांना आयव्ही आयर्न/सुक्रोज इंजेक्शन देऊन सुरक्षित प्रसूती सुनिश्चित केली जाईल. हत्तीरोगग्रस्त रुग्णांच्या शस्त्रक्रिया ग्रामीण, उपजिल्हा व जिल्हा रुग्णालयांत नियोजित आहेत. क्षयरोग रुग्णांना केंद्राच्या मार्गदर्शक सूचनांनुसार फूड बास्केट देण्यात येणार आहे.
दरवर्षी नोंद होणाऱ्या कुष्ठरोग रुग्णांच्या सहवासितांना प्रतिबंधक औषधांचा डोस दिला जाईल. गडचिरोलीत मलेरिया निर्मूलनासाठी घरभेटी, अळीनाश, ताप तपासणी व उपचार राबविले जातील. आरोग्यवर्धिनी केंद्रांमार्फत प्रत्येक गावात शिबिरे घेऊन ३० वर्षांवरील नागरिकांची मधुमेह व उच्च रक्तदाब तपासणी १५ मार्चपर्यंत पूर्ण केली जाईल.
तसेच, बांधकाम पूर्ण झालेल्या आरोग्य संस्थांचे हस्तांतरण व कार्यान्वयन ३१ मार्चपूर्वी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या सूचनेनुसार हे सर्व कार्यक्रम राज्यभर प्रभावीपणे राबविले जाणार आहेत.

Comments are closed.