विद्यापीठाच्या हिवाळी-२०२४ सत्रातील चौथ्या टप्प्यातील लेखी परीक्षा २२ मार्चपासून सुरू होत असून, त्या ९ एप्रिलपर्यंत चालणार आहेत. या परीक्षांसाठी राज्यभरातील १०४ परीक्षा केंद्रांवर एकूण १६,४१४ विद्यार्थी प्रविष्ट होणार आहेत. वैद्यकीय शाखेतील महत्त्वाच्या अभ्यासक्रमांच्या या परीक्षांसाठी विद्यापीठाने विशेष नियोजन केले आहे.
या परीक्षांमध्ये वैद्यकीय शिक्षणाच्या विविध शाखांतील दुसऱ्या वर्षाच्या (जुना अभ्यासक्रम / २०१९ पुरवणी) बीएएमएस, बीयूएमएस (२०२१) आणि (सीबीडीसी-२०२२) बीएचएमएस अभ्यासक्रमांच्या लेखी परीक्षांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, यंदा तृतीय वर्ष एमबीबीएस आणि अंतिम वर्ष एमबीबीएसच्या प्रश्नपत्रिका प्रायोगिक तत्वावर ऑनलाइन पद्धतीने परीक्षा केंद्रावर पाठवण्यात आल्या होत्या. उत्तरपत्रिकांचे स्कॅनिंग करून तपासणी करण्याची प्रक्रिया यंदा राबवण्यात येणार आहे.
परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू यांनी सांगितले की, चौथ्या टप्प्यातील सर्व प्रश्नपत्रिका परीक्षेच्या दिवशी ऑनलाइन पाठवल्या जातील, तसेच उत्तरपत्रिका स्कॅन करून तपासल्या जातील. त्यामुळे परीक्षा प्रक्रियेमध्ये अधिक पारदर्शकता आणि वेग येणार आहे.
विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी आणि परीक्षेच्या सुरळीत पार पडण्यासाठी विद्यापीठाने काही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. परीक्षार्थींनी परीक्षा केंद्रावर एक तास आधी हजर राहावे. सकाळच्या सत्रासाठी सकाळी ९ वाजता आणि दुपारच्या सत्रासाठी दुपारी १ वाजता परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणे बंधनकारक आहे. परीक्षेच्या पारदर्शकतेसाठी आणि वेळेच्या अचूक व्यवस्थापनासाठी विद्यापीठाने हे नवे बदल केले आहेत.