राज्यातील शिक्षक भरती आणि पदसंरचनेबाबत शिक्षण विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यातील एकूण शिक्षक पदांच्या संचमान्यतेसंदर्भात माध्यमिक शिक्षण संचालकांनी आदेश जारी करत माहिती प्रथमच शालार्थ पोर्टलवर सार्वजनिक केली आहे.
उपलब्ध माहितीनुसार राज्यातील एकूण ५,१०,४८६ शिक्षक पदांपैकी ४,९४,६८२ पदांना संचमान्यता देण्यात आली आहे. तर ३,६०६ पदांना मान्यता नाकारण्यात आली असून ४,३९४ पदांची प्रक्रिया अद्याप प्रलंबित असल्याचे सांगण्यात आले आहे. काही पदांची जुळणीची माहिती वरिष्ठ स्तरावर पाठविण्यात आली असून पुढील निर्णयाची प्रतीक्षा आहे.
ही माहिती माहिती अधिकार कायदा २००५ नुसार जाहीर करणे अपेक्षित होते. तब्बल २१ वर्षांनंतर ही अद्ययावत माहिती शालार्थ पोर्टलवर उपलब्ध करण्यात आल्याने काही शिक्षक संघटनांनी या निर्णयाचे स्वागत केले, तर काहींनी यावर नाराजी व्यक्त केली आहे.
शिक्षण विभागाच्या नियमानुसार एखाद्या शाळेला ठरावीक पदांचीच मंजुरी असते. त्यापेक्षा जास्त शिक्षक असल्यास जुळणी प्रक्रियेत अतिरिक्त पदांना नाकारले जाते. या पार्श्वभूमीवर काही संघटनांनी ही माहिती सार्वजनिक करण्याच्या निर्णयाचा फेरविचार करण्याची मागणी केली आहे.
जिल्हानिहाय मंजूर शिक्षक पदांच्या आकडेवारीत पुणे (३०,८३३) हा जिल्हा आघाडीवर आहे. त्यानंतर नाशिक (२८,३९१), अहिल्यानगर (२५,६६६), सोलापूर (२४,६०७), जळगाव (२३,००१) आणि संभाजीनगर (२१,९३३) जिल्ह्यांचा क्रम लागतो. उर्वरित जिल्ह्यांमध्ये मंजूर पदांची संख्या २० हजारांपेक्षा कमी असल्याचे दिसते.

Comments are closed.