महाराष्ट्र पोलीस भरती प्रक्रिया अधिक पारदर्शक, सुरक्षित आणि अचूक करण्यासाठी पुणे पोलीस प्रशासनाने मोठा निर्णय घेतला असून, भरती प्रक्रियेत आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे उमेदवारांना न्याय्य संधी मिळणार असून, भरतीदरम्यान होणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या फसवणुकीला आळा बसणार आहे.

पोलीस शिपाई, वाहनचालक तसेच कारागृह विभागातील भरती आता AI प्रणालीच्या कडक देखरेखीखाली पार पडणार आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, डमी उमेदवार, बनावट कागदपत्रे किंवा मानवी चुका यांना या प्रणालीमुळे पूर्णतः प्रतिबंध होणार आहे.
AI कसे करणार काम?
चेहरा ओळख प्रणाली (Face Recognition):
उमेदवार मैदानात प्रवेश करताच त्याचा चेहरा आधी नोंदवलेल्या माहितीसोबत जुळवला जाईल. डमी उमेदवार किंवा फसवणूक करणाऱ्यांचा प्रवेश तात्काळ रोखला जाईल. तसेच छातीच्या मोजमापावेळी क्षेत्राबाहेर गेलेल्या उमेदवाराची ओळख AI प्रणाली पुन्हा निश्चित करणार आहे.
धावण्याच्या चाचणीसाठी स्मार्ट सेन्सर:
धावण्याच्या चाचणीत वापरण्यात येणाऱ्या विशेष सेन्सरयुक्त रनर बसद्वारे उमेदवाराचा अचूक वेळ थेट संगणक प्रणालीत नोंदवला जाईल. यामुळे मानवी चूक किंवा जाणूनबुजून वेळेत फेरफार करण्याची शक्यता संपुष्टात येणार आहे.
अर्जांचा वाढता प्रतिसाद
यंदाच्या भरतीसाठी उमेदवारांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे.
- पोलीस कॉन्स्टेबल: १,८३३ पदांसाठी तब्बल ८६,२४० अर्ज
- ड्रायव्हर: १०३ पदांसाठी ४२,८९६ अर्ज
- कारागृह शिपाई: १३० पदांसाठी २०,७९१ अर्ज
AI प्रणालीच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे खऱ्या आणि पात्र उमेदवारांनाच संधी मिळेल, तर फसवणूक करणाऱ्यांचा मार्ग पूर्णतः बंद होईल, असा ठाम विश्वास महाराष्ट्र पोलीस प्रशासनाने व्यक्त केला आहे.

Comments are closed.