आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटकातील राज्यातील कोट्यवधी महिलांना ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’मुळे मोठा दिलासा मिळत आहे. या योजनेअंतर्गत दरमहा 1500 रुपये थेट महिलांच्या खात्यात जमा होत असून त्यामुळे अनेक महिला स्वावलंबी बनल्या आहेत. मात्र, योजना सुरू करताना ठरवलेल्या अटी डावलून काही अपात्र महिलांनीही लाभ घेतल्याचे निदर्शनास आल्यानंतर शासनाने ई-केवायसी बंधनकारक केली आहे.

ज्या लाभार्थी महिलांचे ई-केवायसी पूर्ण होईल, त्यांनाच पुढे लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार आहे. पात्र असूनही ई-केवायसी न केल्यास संबंधित महिलेचे नाव लाभार्थी यादीतून वगळले जाऊ शकते. सुरुवातीला नोव्हेंबरपर्यंत ई-केवायसीची मुदत देण्यात आली होती, मात्र लाखो महिलांची प्रक्रिया अपूर्ण राहिल्याने ही मुदत वाढवून 31 डिसेंबरपर्यंत करण्यात आली आहे.
महिला व बालविकास विभागाने बोगस लाभार्थी वगळण्यासाठी ई-केवायसीची अट कडक केली असून, अनेक महिलांना तांत्रिक अडचणींमुळे ई-केवायसी करता येत नसल्याचे समोर आले. त्यामुळे संगणकीय प्रणालीत सुधारणा करून आता ही जबाबदारी थेट अंगणवाडी सेविकांकडे सोपवण्यात आली आहे. ज्या महिलांचे ई-केवायसी अद्याप झालेले नाही, त्यांच्या घरी जाऊन आवश्यक कागदपत्रे तपासून ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.
ई-केवायसी अपूर्ण राहिल्यामुळे अनेक महिलांना दरमहा मिळणाऱ्या 1500 रुपयांच्या लाभात अडथळे येत होते. मात्र, आता अंगणवाडी सेविकांच्या मदतीने ही प्रक्रिया सुलभ होणार आहे. तरीही, 31 डिसेंबरपर्यंत ई-केवायसी पूर्ण न करणाऱ्या महिलांना योजनेतून वगळण्यात येणार असून त्यांच्या खात्यात पुढे पैसे जमा होणार नाहीत, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.
सध्या लाडकी बहीण योजनेचे सुमारे अडीच कोटी लाभार्थी असून सरकारकडून दरमहा मोठ्या प्रमाणावर निधी वितरित केला जात आहे. ई-केवायसीची अट पूर्ण व्हावी यासाठी अंगणवाडी सेविका पुढे आल्या असून, त्यांच्या सहाय्याने पात्र महिलांना योजनेचा लाभ कायम ठेवण्यासाठी प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Comments are closed.