ठाणे जिल्ह्यात आरटीई अंतर्गत प्रवेश प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून, आज (१ एप्रिल) प्रवेश निश्चित करण्याचा शेवटचा दिवस आहे. पहिल्या प्रतीक्षा यादीतील निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा प्रवेश जलद गतीने पूर्ण करण्यासाठी शिक्षण विभागाने पालकांना तत्काळ प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे.

आरटीईच्या २५% आरक्षित जागांसाठी जिल्ह्यातून २५,७७४ अर्ज प्राप्त झाले होते, त्यापैकी १०,४२९ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. मात्र, आतापर्यंत केवळ ६,७२१ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला आहे. परिणामी, प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी देण्यात आली.
प्रथम प्रतीक्षा यादीत २,७०५ विद्यार्थ्यांची निवड झाली होती. सुरुवातीला पालकांना २४ मार्चपर्यंत प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्याची मुदत देण्यात आली होती. मात्र, कमी प्रतिसाद पाहता ती १ एप्रिलपर्यंत वाढविण्यात आली. तरीही, ३१ मार्चपर्यंत केवळ १,०५७ विद्यार्थ्यांनीच प्रवेश निश्चित केला आहे.
शिक्षण विभागाने पालकांना विनंती केली आहे की, ज्यांच्या पाल्याचा प्रवेश अद्याप निश्चित झालेला नाही, त्यांनी आवश्यक कागदपत्रांसह त्वरित प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी. आजच्या नंतर संधी उपलब्ध होणार नाही, त्यामुळे पालकांनी वेळेचा अपव्यय न करता आपल्या मुलांचे शिक्षण निश्चित करावे.

Comments are closed.