सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आयक्यूएसी समन्वयक डॉ. विनायक जोशी यांनी सांगितले की, आविष्कार संशोधन स्पर्धा विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाची आवड वाढवण्यासाठी विद्यापीठाद्वारे राबवली जाते. कोणतेही संशोधन करण्यासाठी सातत्याने प्रयोग करणे आवश्यक असते आणि प्रत्येक वेळेस यश मिळणे गरजेचे नाही; अपयश हे यशाची पहिली पायरी असते. या स्पर्धेतून भविष्यात भारतीय संशोधन क्षेत्राचे दूत निर्माण होतील, असे डॉ. जोशी यांनी नमूद केले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व सोमेश्वरनगर येथील मु.सा. काकडे महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने विभागीय स्तरावरील आविष्कार स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन अण्णासाहेब मगर महाविद्यालयाचे प्राचार्य आणि विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. नितीन घोरपडे यांच्या शुभहस्ते झाले. यावेळी महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष अभिजीत काकडे-देशमुख, विद्यापीठ आविष्कार संशोधन समितीचे अध्यक्ष व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे, संस्थेचे सचिव सतीशराव लकडे, तसेच अन्य प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.
डॉ. विनायक जोशी यांनी सांगितले की, माणसामध्ये शिकण्याची उत्सुकता असते, पण त्याला योग्य दिशा देणे शिक्षण क्षेत्राचे कार्य आहे. आविष्कार संशोधन स्पर्धा विद्यार्थ्यांना संशोधनात रुजू करण्यासाठी, प्रयोगशीलता वाढवण्यासाठी आणि नवकल्पनांना प्रोत्साहन देण्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. अपयशाला धैर्याने सामोरे जाताना प्रत्येक विद्यार्थी नवीन अनुभव घेऊ शकतो.
डॉ. नितीन घोरपडे यांनीही सांगितले की, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात संशोधनाला प्राधान्य दिले गेले आहे. आधुनिक संशोधनासाठी भारतीय ज्ञान परंपरा पूरक आहे. आविष्कार स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाची वृत्ती वाढीस लागली आहे आणि त्यातून विद्यार्थ्यांना नवीन संशोधन संधी मिळतात.
डॉ. देविदास वायदंडे यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना सांगितले की, विद्यार्थ्यांमध्ये संशोधन वृत्ती रुजावी, नवीन कल्पना सुचवण्यासाठी प्रोत्साहन मिळावे आणि शैक्षणिक प्रतिभा अभिव्यक्तीसाठी संधी उपलब्ध व्हावी, ह्या उद्देशाने आविष्कार स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
विकास समितीचे अध्यक्ष अभिजीत काकडे-देशमुख यांनी सर्व स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या आणि सांगितले की, या स्पर्धेमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाची वाढ होण्यास मदत होईल. त्यांनी विद्यार्थ्यांना सातत्याने प्रयत्न करत राहण्याचे आवाहन केले.
या स्पर्धेत पुणे शहरातील विविध महाविद्यालयातील पदवी, पदव्युत्तर आणि संशोधक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. एकूण ३०५ संशोधन प्रकल्प सादर करण्यात आले, तर ७५० विद्यार्थी सहभागी झाले. प्रकल्पांचे परीक्षण डॉ. संजय झगडे, डॉ. विनोद कुलकर्णी, डॉ. प्रज्ञा जगताप, डॉ. अभिजीत लिमये, डॉ. सविता कुलकर्णी, डॉ. स्मिता खत्री, डॉ. सुनिता धमाणे, डॉ. विद्या पाटणकर, डॉ. रुपेश देवकाते, डॉ. माधुरी बोरावके, डॉ. गिरधर नराळे आणि डॉ. शशिकांत शिंदे यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक समन्वयक डॉ. श्रीकांत घाडगे यांनी केले, सूत्रसंचालन प्रा. अच्युत शिंदे यांनी केले आणि आभार रजनीकांत गायकवाड यांनी मानले. या संपूर्ण स्पर्धेतून विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाची आवड निर्माण झाली असून, भविष्यातील संशोधक भारतीय संशोधन क्षेत्रात आपले योगदान देतील, असे या कार्यक्रमातून दिसून आले.

Comments are closed.