भूमिअभिलेख विभागात तब्बल ९०५ पदे भरण्यास राज्य सरकारकडून तत्त्वतः मान्यता देण्यात आली आहे. पुणे, मुंबई, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती आणि नागपूर या महसूल विभागात ही पदभरती होणार असून, त्यामुळे शेकडो उमेदवारांना सरकारी सेवेत संधी मिळणार आहे.

लघुलेखक आणि भूकरमापकांची मागणी
या भरतीत लघुलेखक (उच्चश्रेणी), लघुलेखक (निम्न श्रेणी) यांच्यासोबतच भूकरमापक (सर्व्हेअर) पदांचा समावेश आहे. भूमिअभिलेख विभाग हा महसूल विभागातील एक महत्वाचा पाया असल्याने या भरतीला विशेष महत्त्व लाभले आहे.
जमिनीच्या मोजणीतील अडथळे
राज्यात जमिनीच्या मोजणीचे अनेक प्रकरणे प्रलंबित आहेत. दोन वर्षांपूर्वीच राज्यात १,२०० भूकरमापकांची भरती झाली होती, परंतु तब्बल ७०० जणांनी विविध कारणांनी राजीनामे दिल्याने अनेक पदे रिक्त राहिली. यामुळे मोजणीचे काम ठप्प झाले होते.
महसूल विभागाला दिलासा
रिक्त पदांमुळे अनेक प्रकरणे थांबली होती. शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांची जमीनसंबंधीची कामे रखडत होती. आता नव्या भरतीला मान्यता मिळाल्याने महसूल विभागाला दिलासा मिळणार असून कामकाजाला गती येईल.
शासनाची तत्त्वतः मान्यता
भूमिअभिलेख विभागाकडून सरकारकडे या भरतीसाठी प्रस्ताव पाठविण्यात आला होता. अखेर सरकारने त्याला हिरवा कंदील दिला आहे. यामुळे दीर्घकाळापासून भरतीची वाट पाहणाऱ्या उमेदवारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
पदांचा तपशील
- लघुलेखक (उच्चश्रेणी) – २ जागा
- लघुलेखक (निम्न श्रेणी) – ९ जागा
- भूकरमापक (संवर्ग-क)
- मुंबई – २५९
- नाशिक – १२४
- छ. संभाजीनगर – २१०
- अमरावती – ११७
- नागपूर – ११२
रोजगाराच्या नव्या संधी
या भरतीमुळे राज्यातील तरुणांना सरकारी सेवेत मोठी संधी उपलब्ध होणार आहे. तसेच ग्रामीण व शहरी भागातील शेतकऱ्यांचे व सर्वसामान्यांचे जमिनीशी संबंधित प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी गती मिळणार आहे.
उमेदवारांमध्ये उत्सुकता
आता पुढील काही दिवसांत भरतीसंबंधी सविस्तर जाहिरात जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उमेदवार तयारीस लागले असून, या संधीसाठी अर्ज कधी सुरू होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Comments are closed.