पणजीत गोवा सरकारच्या विविध खात्यांमधल्या 752 रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आलीय. गोवा कर्मचारी निवड आयोगाकडून ही भरती हाती घेण्यात येतीये. सध्या 50 पदं भरली गेलीत, आणि बाकीच्यांची भरती टप्प्याटप्प्याने होणार, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.
पाटो-पणजी इथं आयोगाच्या नव्या कार्यालयाचं उद्घाटन करताना ते बोलत होते. मुख्यमंत्री म्हणाले की, आता राज्यातली सगळी सरकारी भरती प्रक्रिया आयोगाच्याच माध्यमातून पार पडणार. संगणकाधारित परीक्षा व तात्काळ निकाल प्रणालीमुळे संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक व निष्पक्ष होईल.
मानवी हस्तक्षेप टाळण्यासाठी सगळं डिजिटल पद्धतीनं राबवलं जाणार आहे. नविन कार्यालयात सीसीटीव्ही, दिव्यांगांसाठी सुविधा, स्वतंत्र संगणक कक्ष, आणि ऑनलाइन अर्ज व परीक्षा व्यवस्थापन असं अत्याधुनिक सेटअप आहे. गट ब आणि गट क श्रेणीतील कोणतीही भरती आता संबंधित विभाग स्वतंत्रपणे करू शकणार नाही.
हे सरकार केवळ नोकऱ्या देत नाही, तर गोमंतकीय तरुणांना न्याय देतंय, असंही मुख्यमंत्र्यांनी ठणकावून सांगितलं. योग्य पात्रतेनं आणि पारदर्शक पद्धतीनं भरती झाल्यास सरकारवरचा लोकांचा विश्वास अधिक मजबूत होतो, हे देखील त्यांनी अधोरेखित केलं.

Comments are closed.