२०२५ हे वर्ष जगभरातील तंत्रज्ञान क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी कठीण ठरत आहे. मंदावलेल्या जागतिक अर्थव्यवस्थेमुळे आणि कंपन्यांच्या पुनर्रचनेमुळे मोठ्या प्रमाणावर नोकरकपात होत असून, नोव्हेंबरअखेरपर्यंत तब्बल ११.७ लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांनी नोकऱ्या गमावल्या आहेत. महामारीनंतर प्रथमच इतक्या मोठ्या स्तरावर ही कपात नोंदवली गेली आहे.
कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), ऑटोमेशनचा वेगवान वापर, घटलेला विकासदर आणि कोविडनंतर करण्यात आलेली अतिरिक्त भरती ही या परिस्थितीमागची प्रमुख कारणे मानली जात आहेत. विशेषतः टेक कंपन्या, स्टार्टअप्स, बँकिंग व वित्तीय सेवा क्षेत्राला याचा सर्वाधिक फटका बसला आहे. अमेरिका आणि भारतात या कपातीचे परिणाम अधिक तीव्रपणे जाणवत आहेत.
जानेवारीपासून आतापर्यंत ४,२०० हून अधिक कंपन्यांनी कर्मचारी कमी करण्याची घोषणा केली आहे. जनरेटिव्ह AIमुळे कोडिंग, डेटा विश्लेषण आणि ग्राहक सेवा यांसारखी कामे स्वयंचलित झाल्याने मानवबळाची गरज घटली आहे. रिटेल आणि वेअरहाउसिंग क्षेत्रातही कपात वाढली असून विकसित देशांत बेरोजगारीचा आलेख चढताना दिसतो आहे.
या पार्श्वभूमीवर तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी कौशल्यवृद्धी, नव्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेणे आणि पर्यायी संधींचा शोध घेणे अधिक महत्त्वाचे ठरत आहे.

Comments are closed.