राज्यातील दहावी बोर्डाच्या भूगोल विषयाच्या पेपराबाबत निर्माण झालेला संभ्रम अखेर दूर झाला असून, उद्याचा पेपर ठरलेल्या वेळापत्रकानुसारच होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांनी याबाबत अधिकृत घोषणा करत विद्यार्थ्यांना शांतपणे परीक्षा देण्याचे आवाहन केले आहे.

सांगोला (जि. सोलापूर) येथे भूगोलाच्या ५० प्रश्नपत्रिका चोरीला गेल्याची घटना उघडकीस आल्यानंतर पालक व विद्यार्थ्यांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली होती. उद्याचा पेपर होणार की नाही, असा प्रश्न सर्वांनाच पडला होता.
या घटनेनंतर बोर्डाने तातडीने अहवाल मागवून परिस्थितीचा आढावा घेतला. तरीही पेपर वेळापत्रकानुसारच घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बोर्डाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांनी कोणतीही भीती न बाळगता तयारीनिशी परीक्षा द्यावी, असे आवाहन केले.
दरम्यान, चोरी झालेल्या प्रश्नपत्रिकांचे फोटो किंवा झेरॉक्स व्हायरल झाले असतील का, याबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत. या प्रकरणी निष्काळजीपणा आढळल्याने सांगोल्यातील प्रभारी शिक्षणाधिकारी सुयोग नवले आणि मुख्याध्यापक अमोल गायकवाड यांना निलंबित करण्यात आले आहे. तसेच सुरक्षा व्यवस्थेत त्रुटी आढळल्यास संबंधित पोलीस व होमगार्ड कर्मचाऱ्यांवरही कारवाई होण्याची शक्यता आहे.
या सर्व घडामोडींमुळे निर्माण झालेल्या तणावानंतरही बोर्डाने परीक्षा नियोजित वेळेनुसार घेण्याचा निर्णय घेतल्याने विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Comments are closed.