फिक्की–ॲनारॉकच्या ताज्या अहवालानुसार भारतामधील ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर्स (GCC) क्षेत्र 2030 पर्यंत झपाट्याने वाढणार असून सुमारे 9 लाख नवे रोजगार निर्माण होण्याचा अंदाज आहे. सध्या 1,700 असलेली जीसीसींची संख्या 2,400 पर्यंत पोहोचेल, अशी माहिती देण्यात आली आहे.

आयटी, आरअँडडी, बीएफएसआय, हेल्थकेअर, डेटा अॅनालिटिक्स आणि अभियांत्रिकी संशोधन यांसारख्या क्षेत्रांत वाढती मागणी असल्याने भारताची कार्यालयीन बाजारपेठ वेगात विस्तारत आहे. 2025 मध्ये दिल्ली, मुंबई, पुणे, बेंगळुरू, चेन्नई, हैदराबाद व कोलकाता या सात शहरांत कार्यालयीन भाडेपट्ट्यांपैकी 40 टक्क्यांहून अधिक वाटा जीसीसीचा राहिला.
2024 अखेरीस भारतात 19 लाखांहून अधिक कर्मचारी जीसीसीमध्ये कार्यरत असून, 2030 पर्यंत ही संख्या 28 लाखांवर जाण्याची शक्यता आहे. याच काळात जीसीसी बाजारपेठेची उलाढाल 30 अब्ज डॉलर्सवरून 64 अब्ज डॉलर्सपर्यंत वाढली आहे.
आघाडीच्या सात शहरांसोबतच जयपूर, इंदूर, सुरत, कोची आणि कोईम्बतूर यांसारखी टियर-2 शहरेही जीसीसी विस्ताराची नवी केंद्रे ठरत आहेत. कुशल मनुष्यबळ, किफायतशीर खर्च आणि आधुनिक कार्यालयीन पायाभूत सुविधा यामुळे भारत जागतिक कंपन्यांसाठी पसंतीचा हब बनत असल्याचे अहवालात नमूद केले आहे.

Comments are closed.