शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! केळी, मोसंबी, पपई, संत्री, आंबा आणि डाळिंब या प्रमुख फळपिकांसाठी राज्य सरकारकडून पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना जाहीर करण्यात आली आहे.
या योजनेअंतर्गत आंबिया बहार २०२५-२६ हंगामासाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून, कृषी विभागाने सर्व शेतकऱ्यांना यात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
या योजनेअंतर्गत प्रत्येक पिकासाठी अर्ज करण्याच्या अंतिम मुदती वेगवेगळ्या ठेवण्यात आल्या आहेत. द्राक्ष आणि स्ट्रॉबेरी पिकासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ ऑक्टोबर २०२५, तर केळी, मोसंबी आणि पपईसाठी ३१ ऑक्टोबर २०२५ आहे. संत्री पिकासाठी ३० नोव्हेंबर, आंबा पिकासाठी ३१ डिसेंबर, आणि डाळिंब पिकासाठी १४ जानेवारी २०२६ ही अंतिम मुदत राहील.
ही योजना पुणे, सोलापूर आणि अहिल्यानगर जिल्ह्यांत बजाज अलियान्झ जनरल इन्शुरन्स कंपनीतर्फे राबविली जात आहे. शेतकऱ्यांकडे या योजनेत सहभागी होण्यासाठी किमान २० गुंठे ते कमाल ४ हेक्टर इतकी उत्पादनक्षम फळबाग असणे आवश्यक आहे.
अर्ज प्रक्रियेसाठी काही महत्वाची कागदपत्रे आवश्यक आहेत — अॅग्रीस्टॅक नोंदणी, आधार क्रमांक, बँक खाते तपशील, जमीन धारणा उतारा, तसेच फळबागेचा जिओ टॅग केलेला फोटो. भाडेपट्टीवर शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी नोंदणीकृत भाडेकरार आणि ई-पीक पाहणी अहवाल देणे बंधनकारक आहे.
अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी आपल्या जवळच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा किंवा राज्य शासनाच्या अधिकृत संकेतस्थळाला — www.krishi.maharashtra.gov.in — भेट द्यावी.