पुण्यात एका कार्यक्रमात बोलताना ज्येष्ठ पत्रकार आणि माजी खासदार कुमार केतकर यांनी सध्याच्या फुकट वाटपाच्या योजना आणि त्याचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर होणारा दुष्परिणाम यावर जोरदार टीका केली.
“‘लाडकी बहीण’सारख्या योजना केवळ राजकीय लोकप्रियतेसाठी असून, त्यांचा आर्थिक पाया कमकुवत करतात,” असं ते ठासून म्हणाले.
ते म्हणाले की, ८० कोटी लोकांना मोफत धान्य देणं आणि आधार कार्डवर फुकट पैसा वाटणं ही समाजकल्याण नाही, तर निव्वळ अर्थनाश आहे. त्यामुळे २०४७ पर्यंत ५ ट्रिलियन डॉलरची स्वप्नं पाहणं हास्यास्पद ठरतंय.
‘अन्नपूर्णा परिवार’ आणि डॉ. मेधा पुरव-सामंत यांच्या कार्यावर आधारित ‘आम्ही स्वयंपूर्णा’ पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमात केतकर बोलत होते. यावेळी डॉ. अजित रानडे, अभिनेत्री चिन्मयी सुमीत यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
केतकरांनी असंही सांगितलं की, अन्नपूर्णा परिवारातल्या महिलांनी सरकारी मदत न घेता व्यवसाय उभा केला, ही खरी आर्थिक क्रांती आहे. याच्या बरोबरीने ‘लाडकी’ योजना म्हणजे केवळ फसव्या घोषणा आहेत.
“आता मध्यमवर्गाने कृतज्ञता विसरली आहे. बँक राष्ट्रीयीकरण, शिक्षकांचे वेतनवाढीचे मोर्चे, हरित क्रांती – हे सगळं विसरून लोक फक्त लाभधोरणांच्या मागे लागले आहेत,” अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
डॉ. रानडे यांनी एआयमुळे रोजगार कमी होण्याच्या धोक्याची जाणीव करून दिली आणि सांगितलं की, ‘अन्नपूर्णा’च्या आत्मनिर्भरतेचा आदर्श पद्धत म्हणून देशभर राबवायला हवा.

Comments are closed.