राज्यातील विद्यापीठे आणि संलग्न महाविद्यालयांमधील रिक्त प्राध्यापक पदांची भरती जून २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत.
ठरलेल्या मुदतीपर्यंत भरती प्रक्रिया पूर्ण न झाल्यास संबंधित विद्यापीठे व महाविद्यालयांमधील पदसंख्या कमी करण्याची कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.
होमी भाभा राज्य विद्यापीठात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०च्या अंमलबजावणीसंदर्भात आयोजित आढावा बैठकीत त्यांनी ही सूचना केली. या बैठकीला विविध विद्यापीठांचे कुलगुरू, प्र-कुलगुरू आणि शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
विद्यापीठांची राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्रमवारी सुधारण्यासाठी शैक्षणिक गुणवत्ता, संशोधनवृद्धी, अध्यापनातील नावीन्य आणि प्रशासनातील कार्यक्षमता वाढविण्यावर भर देणे आवश्यक असल्याचे पाटील यांनी सांगितले. तसेच गुणवत्तावृद्धीसाठी ठोस कृती आराखडा तयार करून त्याची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देशही देण्यात आले.
बैठकीत प्राध्यापक भरती प्रक्रियेवर सविस्तर चर्चा करण्यात आली. विद्यापीठे व महाविद्यालयांमधील रिक्त पदांची माहिती गोळा करून नियमानुसार तातडीने भरती प्रक्रिया राबविण्याचे आदेश देण्यात आले असून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितासाठी प्राध्यापकांची उपलब्धता सुनिश्चित करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Comments are closed.