महाराष्ट्र सरकारच्या महिला व बालविकास विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा १,५०० रुपयांचा आर्थिक लाभ दिला जातो. हा लाभ कोणत्याही अडथळ्याविना सुरू राहावा यासाठी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे अत्यावश्यक असल्याचे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले आहे. सर्व पात्र महिलांनी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत ई-केवायसी करून घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.

आदिती तटकरे यांनी लाडक्या बहिणींना संबोधित करताना सांगितले की, ई-केवायसी न केल्यास योजनेचा लाभ खंडित होऊ शकतो. त्यामुळे आता केवळ शेवटचे काही दिवस शिल्लक असून, सर्व महिलांनी तातडीने आपली ई-केवायसी पूर्ण करावी. सुरुवातीला १८ नोव्हेंबरपर्यंत ई-केवायसीची मुदत देण्यात आली होती.
त्यानंतर महिलांच्या सोयीसाठी मुदतवाढ देत ३१ डिसेंबरपर्यंत अंतिम संधी देण्यात आली आहे. याशिवाय ई-केवायसी करताना चुकून चुकीचा पर्याय निवडलेल्या महिलांना दुरुस्तीसाठीही एकदाच संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
दरम्यान, योजनेतील लाभार्थी महिलांना ऑक्टोबर महिन्याचा १,५०० रुपयांचा हप्ता ३ व ४ नोव्हेंबर रोजी देण्यात आला होता. मात्र, नोव्हेंबर व डिसेंबर महिन्याचे हप्ते अद्याप प्रलंबित असल्याने महिलांमध्ये प्रतीक्षेचे वातावरण आहे. एकीकडे ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी धावपळ सुरू असताना, दुसरीकडे या दोन महिन्यांच्या हप्त्याची महिलांना आतुरतेने वाट पाहावी लागत आहे.
विधानसभेत १० डिसेंबर रोजी दिलेल्या माहितीनुसार, त्या वेळेपर्यंत राज्यातील १ कोटी ७४ लाख महिलांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली होती. विशेष म्हणजे, लाडकी बहीण योजनेअंतर्गत सर्वसाधारण लाभार्थी महिलांना दरमहा १,५०० रुपये दिले जातात.
तर, पीएम किसान सन्मान निधी किंवा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ घेणाऱ्या महिला शेतकऱ्यांना लाडकी बहीण योजनेतून ५०० रुपये दिले जातात. त्यामुळे ई-केवायसी पूर्ण करून लाभ अखंड सुरू ठेवणे प्रत्येक लाडक्या बहिणीसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरत आहे.

Comments are closed.