मध्यपूर्वेतील तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने व्यावसायिक वापरासाठीच्या LPG सिलेंडरचा पुरवठा तात्पुरता थांबवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे.
इराण-इस्रायल संघर्षामुळे होर्मुझ सामुद्रधुनीतील वाहतूक विस्कळीत झाल्याने LPG आयातीवर परिणाम झाला असून त्याचा थेट परिणाम भारतातील गॅस पुरवठ्यावर होत आहे.
घरगुती गॅसचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे. मात्र या निर्णयामुळे देशभरातील हॉटेल, रेस्टॉरंट आणि फूड इंडस्ट्रीसमोर मोठे संकट उभे राहिले आहे.
नागपूर रेसिडेंट हॉटेल असोसिएशनने केंद्र सरकारकडे या निर्णयाचा पुनर्विचार करण्याची मागणी केली आहे. कमर्शियल गॅसचा पुरवठा दीर्घकाळ बंद राहिल्यास चार-पाच दिवसांत हॉटेल उद्योग ठप्प होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान पुण्यातील बीपीसीएलच्या शिक्रापूर प्लांट आणि एचपीसीएलच्या चाकण प्लांटमधूनही व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा थांबवण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. सध्या भारताकडे सुमारे ३० दिवसांचा LPG साठा उपलब्ध असला तरी संघर्ष दीर्घकाळ सुरू राहिल्यास गॅस पुरवठ्यावर आणखी ताण येऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

Comments are closed.