नागपूर जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला गती देणारा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत कळमेश्वर तालुक्यातील लिंगा येथे प्रस्तावित ‘कोल टू केमिकल’ प्रकल्पासाठी तब्बल ११७ हेक्टर १९ आर (सुमारे २९० एकर) जमीन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे (एमआयडीसी) हस्तांतरित करण्यास मंजुरी देण्यात आली. या निर्णयामुळे नागपूर जिल्ह्याच्या औद्योगिक नकाशावर एक नवे पर्व सुरू होणार आहे.

महसूल मंत्री तसेच नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा प्रकल्प मार्गी लागला आहे. महसूल विभागाने जमीन हस्तांतरणाची प्रक्रिया तातडीने पूर्ण केली असून, लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. कोळशापासून विविध रसायनांचे उत्पादन करणारा हा आधुनिक प्रकल्प पर्यावरणीय निकषांचे काटेकोर पालन करून उभारण्यात येणार आहे.
या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे कळमेश्वर, काटोल आणि नागपूर परिसरातील सुमारे ३० हजार तरुणांना थेट व अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. औद्योगिक गुंतवणुकीला चालना मिळाल्याने स्थानिक अर्थव्यवस्थेला बळकटी मिळेल आणि परिसराचा सर्वांगीण विकास साधला जाईल, अशी अपेक्षा आहे.

Comments are closed.