आगामी शैक्षणिक वर्षासाठी अकरावी प्रवेश प्रक्रिया पुन्हा एकदा केंद्रीकृत ऑनलाइन पद्धतीनेच राबवली जाणार असून, शिक्षण विभागाने यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. विद्यार्थ्यांचे अर्ज अचूक भरले जावेत यासाठी सरकारी व अनुदानित शाळांमध्ये मार्गदर्शन केंद्रे उभारण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
दहावीची परीक्षा संपल्यानंतर विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशाची उत्सुकता असते. याच पार्श्वभूमीवर शिक्षण संचालनालयाने शाळांना विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन सत्रे आयोजित करण्यास सांगितले आहे, जेणेकरून अर्ज प्रक्रिया सुलभ होईल.
राज्य मंडळासह इतर मंडळांतील विद्यार्थ्यांनाही ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. प्रवेश पूर्णपणे गुणवत्तेनुसार होणार असून, संस्थांतर्गत, व्यवस्थापन व अल्पसंख्याक कोटा उपलब्ध राहील. आरक्षणानुसार पहिल्या तीन फेऱ्यांमध्ये जागा भरल्या जातील.
विद्यार्थ्यांनी अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे आधीच तयार ठेवावीत, जसे की दहावीचे गुणपत्रक, शाळा सोडल्याचा दाखला, अधिवास, जात, नॉन-क्रीमी लेअर, EWS, दिव्यांग किंवा क्रीडा प्रमाणपत्र इत्यादी, जेणेकरून शेवटच्या क्षणी गडबड होणार नाही.

Comments are closed.